Tuesday 28 October 2008

परत एकदा पहिल्यासारखे, होणे नाही, होणे नाही...

संदर्भहीन आनंदाच्या तहानेत
निष्फळ अंतहीन वणवण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
पुन्हापुन्हा तेच सण

आपण सध्या जगतोय, ते विकत की फुकट? एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीसाठी सहन करतात माणसं आपला चिडचिडाट आणि व्हायसा व्हर्सा? रोज उठून थोबाडावर प्लॅस्टिकचं स्मायली ताणून बसवतो आपण, ते नक्की कुठल्या अन्ब्रेकेबल रबरबॅण्डनी? असले आचरट प्रश्न पाडून कपाळावर किमान साडेचार आठ्या बसवलेल्या तिच्याकडे, निदान दिवसाच्या अखेरीला तरी कुणी शहाणा माणूस दोन गोड शब्दांच्या अपेक्षेनं यायचा नाही, इतपत व्यवस्था दिवसभरानं करून ठेवलेली. ती नखभर कारटी गात टीव्हीवर जीव तोडून, त्यावरही जळजळीत ऍसिडिक प्रतिक्रियांची आतषबाजी चालू असे तिची. चेहरा अर्थात हसराच. पण ’आयुष्यावर हसणे थुंकून देतो...’मधलं कडूजहर हसणं. काय बिशाद कुणी जवळ येऊ धजेल. अशात त्या दिवशी टीव्हीसमोर लोळून समोर गळणार्‍या कशावर तरी काहीतरी फूत्कारताना, तिच्या रूममेटनं तिच्या कपाळावर तळवा ठेवला फक्त. त्यावर काहीतरी धारदार बोलण्याआधी तिचे डोळे आपसूक मिटले आणि तिसर्‍या सेकंदाच्या आत तिचं विमान उडालं. निळी स्वप्नील झोप.

जिवंत माणसाचा स्पर्श, माणसाला माणूस लागतं, तुसडेपणा जन्माला पुरत नाही... हे क्लिशेड गुळगुळीत सिद्धान्त तर होतेच. पण पाठोपाठ माणसांच्या गुंतागुंतीत जे जे होऊ शकतं, ते ते सगळं कोपर्‍यावर दबा धरून बसलं असणार, याचीही कडवट जाणीव होती. ’नाहीतरी माणूस नको म्हणून निभत नाही, मग होऊन जाऊ द्या सगळंच रामायण’ला मान तुकवत तिनं इतके दिवस गोठवून ठेवलेलं आपलेपण स्वैर उधळून दिलं, ते त्या रात्री स्वप्नातच कधीतरी असणार. मग अनेक वाटांनी उधळत गेला दोस्ताना. शॉपोहोलिक होऊन केलेल्या खरेद्या, कविता, सिनेमे, भक्त प्रल्हाद सिनेमे, खादाडी, रात्र रात्र जागून मारलेल्या गप्पा, एकमेकींची आजारपणं, पार्ट्या, ओल्या पार्ट्या, शेअर केलेल्या दुखर्‍या जागा, बोचरी भांडणं, अबोले, करकरीत शिव्या, रडारड, गप्पा गप्पा गप्पा. तिचा कडवट अनुभवी उपरोध आणि रूममेटचा नवथर कोवळा उत्साह जगण्यातला. दोहोंची धार बोथटत गेली आणि त्यांच्या घराला जरा जरा माणूसपण येत गेलं. परिघात पाऊल न ठेवताही शेजार निभावणं शिकत गेलं घर. पहिल्या पावसाच्या जळजळीत ससंदर्भ गारव्यामधेही त्याची ऊब टिकत गेली.

पहिला पाऊस एकवार,
मग मात्र साठवण-आठवण
परत एकदा पहिल्यासारखे,
होणे नाही, होणे नाही

घरातल्या बोर्डावर कुठलीशी नवी कविता डकवताना आणि त्यावर उत्साहानं उतू जात रसरसून बडबडताना लक्षात आला तिच्या एकाएकी - काहीतरी वेगळं घडतंय घरात. रूममेटचं लक्ष होतं आणि नव्हतंही. रूममेटची नव्यानं राहायला आलेली जुनी मैत्रीण हातातल्या नेलपेण्टच्या नव्या शेडमधे गुंतलेली. तिचा चेहरा काहीच संबंध नसल्यासारखा कोरा करकरीत. रूममेट काहीशी भांबावून दोन टोकांना यथाशक्ती यथोचित प्रतिक्रिया देण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात. म्हटलं तर तिघींच्याही लक्षात आलं आणि म्हटलं तर कुणाच्याच नाही. तिथून पुढे कविता बोर्डावर टाचणं हे नुसतंच हट्टी कर्मकांड होत गेलं घरासाठी. वाढलेल्या मैत्रिणीला सामावून घेत माणसं घड्या बदलत गेली. दिनक्रम ठरीव आणि परीटघडीचे होत गेले. उबेचे परीघ बदलत गेले. आपापल्या किल्ल्या, ठरलेल्या वेळी ठरावीक स्मितहास्य, एकमेकींकरता रांधून ठेवलेलं जेवण, वीकेण्डच्या शॉपिंगला सोबत.

वरवर शांत असल्याचं दाखवणारी ती आतून चवताळत गेली. रूममेटच्या मैत्रिणीचं लहान असणं नोंदलं तिनं. पण लहानपणाच्या हातात हात घालून येणारी असुरक्षितता नोंदूनही तिनं हट्टानं स्वीकारली नाही. तिला दिसला तो फक्त तिनं कमावलेल्या तिच्या स्नेहशील वर्तुळाचा संकोच. अभावितपणे कुणाचातरी पायावर पाय पडावा आणि मागचा-पुढचा विचार करण्याआधी तोंडातून कचकचीत शिवी उमटावी, तसा धुमसत गेला तिचा स्वाभाविक संताप. रात्र रात्र गाणी ऐकत राहणं, नेटवरचं वर्तुळ आणि वेळही अमर्याद आणि अनारोग्यकारकपणे विस्तारत जाणं, घरातली संभाषणं जाणीवपूर्वक अधिकाधिक अनावश्यक आणि त्रोटक करत नेणं, पुन्हा एकदा सूडावून आतल्याआत मिटत जाणं. मोठं होण्याचं नाकारत जाणं. सार्‍याचा परिणाम झाला नाही असं नाही. रूममेटची दोन टोकांमधली फरफट वाढत गेली. दिवसेंदिवस. तिच्या एकलकोंड्या धुमसत्या वावराला उत्तरादाखल म्हणून रूममेटचं मुक्यानं रडणं दृष्टीला पडलं चुकून, तेव्हा भानावर आली ती चरचरून. निखळ मैत्रीच्या प्रदेशातही हे स्वामित्वाचे दावे असे वेठीला धरू शकतात माणसांना? आपल्यालाही? आपला नितळपणा इतका गमावला आहे आपण? कळेना. कळेना तिला. आपलेच डंख पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिनं करूनही काही पीळ सुटण्यातले नव्हतेच. घरातली हवा कुंदच होत गेलेली.

पाऊस हवा, ऊन हवं
इंद्रधनुष्य कोरं हवं
पायांखालच्या मातीनंही
रोज नवं जन्मून यावं
आम्ही मात्र तेच जुने
आठवण-पेशी मरत नाही
कोवळेपण जळत जातं,
तरी जगणं सरत नाही

रूममेटच्या मैत्रिणीचं रूममेटवर अनेकार्थांनी अवलंबून असणं दिसत गेलं, तसतसा तिचा समजूतदारपणा काहीसा जून होऊन परतत गेला. रूममेट आणि मैत्रिणीचं नातं, नातं न उरलेलं. दोन वाढती माणसं खूप खूप जवळ येतात आणि त्यांचे विस्ताराचे वेग मात्र स्वाभाविकपणे आपापल्या निरनिराळ्या गती सांभाळून असतात, तेव्हा होते तीच कोंडी. एकाचं विस्तारत जाणं, दुसर्‍याचं आकातांनं तिथंच राहायला पाहणं. पायात पाय रेशीमधागे. ते तुटायला मात्र हवेतच अपरिहार्यपणे. हे लक्षात आलं, तेव्हा ती मुळापासून हादरली. मीच सापडले होते का ऑपरेशन करायला, असा हताश प्रश्न पडला तिला. पण इलाज नव्हताच. मी खलनायिका तर मी खलनायिका, असा कोडगा स्वीकार करत तिनं दोघींच्यात निर्ममपणे पाय घालायला सुरुवात केली.

त्याच काळात कधीतरी पाहिलेली ’सखाराम बाईंडर’ची डीव्हीडी. रविवारची दुपार उलटून गेल्यावर कधीतरी पाहायला सुरुवात केलेली. सुरुवातीला रूममेटची मैत्रीण लक्ष नसल्याचं नाटक करण्यात गुंग. पण तेंडुलकरांनी तिला हाताला धरून मधोमध कधी आणलं, ते तिचं तिलाही कळलं नसणार. सगळा मिळून दीड खोलीचा कारभार आणि घरदार व्यापून उरलेली जगण्याची गरज. लैंगिक इच्छांचे आसूड, संस्कृतीबिंस्कृतीचे कुचकामी लगाम - त्यातून कराकरा दात खात निर्लज्जपणे जगायला उभी ठाकलेली माणसातली पाशवी असुरक्षितता. चंपाला पुरायला मदत करणार्‍या भेसूर लक्ष्मीचं ’रात्र देवाची असते...’ ऐकलं, तेव्हा करकरीत तिन्हीसांजा झालेल्या. घरात काळोख, बाहेर पेटलेली कातरवेळ. ’आपण सगळेच असतो थोडी थोडी लक्ष्मी...’ हे तिच्या तोंडून सुटलेलं वाक्य ऐकून बधिर होऊन बसलेली रूममेटची मैत्रीण आणि कुणाच्या तरी अंत्ययात्रेवरून परतावं, तशी रूममेट घाईघाईनं आंघोळ करायला गेलेली. घर मुकाट.

तिचा परजलेला निर्दय निर्धार. रूममेटची चिंध्या करणारी तडफड. रूममेटच्या मैत्रिणीचा नुसताच जहरी वेडापिसा संताप. सगळंच कडेलोटाच्या टोकावरचं. त्या दिवशी रूममेट मित्रासोबत निघून गेली सिनेमाला, म्हणून भडकलेल्या मैत्रिणीला समजावता समजावता सार्‍याचा कडेलोट झाला. ’मला समजावते आहेस इतक्या मानभावीपणे, का? तू एकटी आहेस म्हणून?’ हा रूममेटच्या मैत्रिणीचा प्रश्न. कोंडीत पकडलेल्या रानमांजरीच्या आवेशातला. तो ऐकला आणि तिचं उरलंसुरलं भान संपलं. उरला तो निव्वळ लालभडक विखार. रूममेटच्या मैत्रिणीनं भानावर येऊन कळवळून अनेकदा मागितलेली माफी, रडणं, पश्चात्ताप, समजावणुकी... काहीच पाझर फोडू शकलं नाही तिला. पाहता पाहता दगड होत गेली ती मैत्रिणीच्या बाबतीत. आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला येण्याचं आमंत्रणही दिलं तिनं, ते फक्त रूममेटला. ’आजारी आहे ग ती. इतका काटेरी राग धरू नकोस...’ची विनवणी तिच्यापर्यंत पोचलीच नाही. तिचा स्वत:चाच इलाज नव्हता जणू.

जिवाच्या तळापासून समजून घेता येतं कुणाला, ते आयुष्यात एकदाच काय? पुढच्या सगळ्या सगळ्या वेळांना माणूस समजूतदार होत जातो की निबर? भोगलेली माणसं हळवी-ओलसर होत जातात की सूडावून अधिकाधिक कठोर? संदर्भ पुसले जातात कधीतरी? पुसता येतात? प्रश्नांना अंत नाहीच.

शब्द पालवत, दु:ख मालवत
रोज रोज तेच मरण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
रोज रोज तेच सण...

Wednesday 22 October 2008

एक नवा उपक्रम: रेषेवरची अक्षरे २००८

रेषेवरची अक्षरे २००८

हा दुवा:
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1

वाचा नि तुमचं मत जरूर कळवा.
शुभ दीपावली!

Wednesday 20 August 2008

आवडलेले थोडे काही

संवेदचा खो घेऊन या कविता पोस्ट करतेय -
हरिलाल
खूप उशिरा ओळख पटत जावी एखाद्याची
तसे जाता जाता
एकमेकांना आवडू लागलेले आपण
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
एखादा पाहुणा नको-नको म्हणत असताना
कोडग्यासारखा राहायला यावा आपल्या घरात
तसा तू माझ्या वस्तीला आलास
आणि खूप मनस्ताप दिलास
तुझ्या आईबाबांसारखाच मलाही.
माझ्यातल्या सगळ्या सवयी,
सगळ्या व्याधी, सगळ्या वेदना पाहून
तुला ओळखीचं वाटलं असेल
कदाचित माझं शरीर,
कदाचित...
तुला श्रीमंत करायचं असेल मला
मला आणखी दु:ख देऊन.
पण तू येण्याच्या खूप आधीपासून
तुझ्यासारखाच खूप वणवणलोय मी
दु:खाच्या शोधात,
इतका...
की तू जेव्हा शिरलास माझ्यात
तेव्हा तुझं दु:ख आणि माझं दु:ख
मला फरकच करता येईना त्यांच्यात.
म्हणूनच लोक
मला तू समजू लागले
आणि तुझा लौकिक इतका
की हळूहळू लोक मलाही ओळखू लागले.
आणि आता
माझ्या भोवताली ही माणसांची गर्दी
'तू' जमवलेली
उद्या ही मला विचारील
'कसा आहेस तू?'
तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ?
मला माणसामाणसांनी समृद्ध करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
मी तुला माझ्यातून जायला सांगत नाही
आणि अजून थोडा थांब म्हणून
राह्यलाही सांगत नाही
इतकी मला आता तुझी सवय झालीय...
आता तुझं असणं-नसणं
माझ्यासाठी एकाच प्रकारचा मनस्ताप!
पण तरी
तू का आवरू लागलायस
माझ्यातलं तुझं एकेक सामान?
का गुंडाळू लागलायस
प्रवेशच्या प्रवेश पानांसकट?
का करू लागलायस बांधाबांध
तासागणिक वर्षांची?

उद्या-परवा
तू अखेरचा पडदा पाडशील आपल्या दोघांत
आणि चालू लागशील दूरची पायवाट
तेव्हा
बाहेर जाताना लहान मूल जसं मागे लागतं...
तसा मी तुझ्या मागे लागू?
मी तुझ्याकडे काही मागू?
प्रयोगागणिक मला लहानाचा मोठा करत जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

उन्हात वणवण फिरताना
मला तुझी आठवण येईलच
आईच्या डोळ्यांत बघताना
माझ्या काळजात धस्स होईलच
तुझा चेहरा विरला तरी
तुझी चाहूल राहीलच...
पण मित्रा, एक सांग...
कुठे जाशील?
काय करशील?
कसा राहशील?
तसा आहेच भणंग मीही
पण जाता-जाता
मला आणखी भणंग करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

('गांधी विरुद्ध गांधी'चे शेवटचे तीन प्रयोग चाल्ले असताना)
सौमित्र
***
कुठून करावी सुरुवात
रोज एक चुटपूट ठेवून देते मी
जिभेखाली विरघळवत तास न् तास.

दिवसभर उन्हातान्हात फिरून शिणलेले शब्द,
थंडीवार्‍यात काकडलेल्या ओळी, पाऊसपाण्यात
चिंब परिच्छेद... एकवटून येतात रात्री
एका पत्रासाठी, जे तुला पाठवण्याची
शक्यता आजमावतेय मी दररोज.

कळत नाही, कुठून करावी सुरुवात
पुन्हा स्वतःला रचायला.
की, काही तरी सलग अर्थाचा शब्द
तुझ्या हातावर ठेवायला हवा...!
कविता महाजन
माझा खो नंदन आणि ए सेन मॅनला.

Friday 1 August 2008

हू दी हेल केअर्स?

फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून उद्दाम प्रदीर्घ विस्तारत गेलेली सूर्यफुलांची शेतं.
इतकंच फक्त.
***

हॅरीचा हातात आलेला सातवा भाग. सात हॉरक्रक्सेस.
एक-दोन-तीन-चार-पाच-सहा-सात.
हॅरीच्या डोक्यात अनाहत घुमणारं चक्र. मरायचं किंवा मारायचं या निवडीतली अपरिहार्यता कळल्यावर होणारी तगमग.
ऑफीसमधलं प्र-चं-ड काम. जवळ येणारी डेडलाईन. डोक्यातला कासावीस गदारोळ.
गोष्टीचा शेवट कळला पाहिजे, शेवट कळलाच पाहिजे -
वाचायला सगळी पहाट आणि सकाळ मिळते. गाडीतही वाचता येतंच. पण ऑफीसमधे? तिथे कसं वाचणार? गोष्टीचा शेवट तर लवकरात लवकर कळला पाहिजे.
हॅरीला पूर्ण तयारीनिशी लढायला उतरायचं आहे. लढणं अपरिहार्य आहे, या हतबलतेतून नव्हे. पूर्ण निर्धारानं. सगळे सगळे संदेह - संशय - गंड बाजूला सारून. आपल्या ताकदीवर पुरा विश्वास ठेवून.
मग मरणं की मारणं यांतले हिशेब आपोआप बाजूला राहतील. फक्त निर्णय घेता आला पाहिजे.
हॉलोज की हॉरक्रक्सेस? अमरत्वाचा शाप की मरणाचं वरदान?
अहं, कुठेतरी काहीतरी चुकतं आहे...
काय चुकतं आहे?
हॅरीची ऍन्क्झायटी आणि माझं ऍड्रेनॅलिन एकत्रच वाढत असलेलं. दोन टास्क्सच्या मधे मी स्क्रीनवर चक्क हॅरीची सॉफ्टकॉपी उघडते.
निर्लज्ज? मेबी. हू दी हेल केअर्स?
त्याच्या-माझ्या विश्वांनी परस्परांचा परीघ छेदला आहे.
भासमय विश्व? मेबी. अगेन, हू दी हेल...
जिवानिशी सुटायचं असेल, तर आता आम्हांला आपापली वर्तुळं चालून पुरी करण्यावाचून गत्यंतर नाही.
आता शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बस्स. बस्स झालं आहे त्याला आता.
ही नाटकी माणसं. त्यांच्या आचरट अपेक्षा. मूर्ख-विकृत साले.
एक त्याची लहानगी बहीण भेटायला हवी आहे आत्ता त्याला...
तिचा मनासारखा निरोप घेतला, की तो पश्चिमेकडे निघून जायला मोकळा.
मग बसा झक मारत. त्याला देणंघेणं नाही. खरंच.
हॉल्डन वेदरफिल्ड त्याचं नाव.
वय? उणंपुरं सोळा वर्षांचं. शरीरातलं गरजांचं उधाण. डोक्यातलं आडव्यातिडव्या विचारांचं. आजूबाजूला पसरलेली तडजोड.
अनाकलनीय आहे हे सगळं त्याला. खोल खोल बुडत चालला आहे तो...
हॉल्डन वेदरफिल्ड मला भेटला, तेव्हा माझं वय त्याच्यापेक्षा बरंच जास्त असलेलं. पण 'तळ्यातली बदकं हिवाळ्यात कुठे जातात?' या त्याच्या प्रश्नानं मला तितक्या सहजासहजी पुढे जाऊन दिलं नाही.
एखाद्या गोडगुलाबी-देवदूती परीकथेतल्या नायकानं झोपण्यापूर्वी निरागसपणे विचारलेला प्रश्न नाही हा. डोण्ट लेट युअरसेल्फ एस्केप फ्रॉम इट.
आत न मावणारा संताप आणि आर्तता त्याच्या प्रश्नात. एक इमर्जन्सी. तिनं मी खिळल्यासारखी झाले.
मी सोईस्कररीत्या विसरून गेले होते, त्या प्रश्नांना त्यानं बिनदिक्कत हात घातलेला.
मला त्याचा इतका भयानक राग का येतो आहे? तो शिवराळ, तो खोटारडा, तो माजोरडा म्हणून?
की थोडा तो माझ्यात आहे, आणि थोडी मी त्याच्यात म्हणून?
आय स्वेअर, असलं काहीतरी बांधलं जातं, तेव्हा सोबत वाट काटण्यावाचून गत्यंतर नसतंच.
होय, मिसरूडही न फुटलेलं कोवळं पोर.
कदाचित खरं - कदाचित खोटं. पण हू दी हेल केअर्स?
शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बदामच्या राणीला वेड्यात काढणारी ऍलिस.
आपल्या गुलाबकळीला जिवापलीकडे जपणारा लिटिल प्रिन्स.
'थोडासा रुमानी हो जाए'मधला बारिशकर.
वादळात बिनदिक्कत जहाज घालणारा कॅप्टन रॉस.
आवेगानं चक्रधरला बिलगत जगून घेणारी हॅर्टा.
'मी लहान मुलासारखा तुझ्या मागे लागू?' असं काकुळून हरिलालला विचारणारा सौमित्र.
काय खरं? काय खोटं?
प्रेयसीला कान कापून देणारा व्हिन्सेण्ट.
त्याच्या फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं.

इतकंच खरं फक्त.

Tuesday 8 July 2008

इक कविता का वादा है, मिलेगी मुझको..

आतड्याची माणसं आपलं मरण स्वीकारत नाहीत तोवर म्हणे आपण मेलेले नसतोच.
शरीर संपून त्याची राख वा माती होतही असेल कदाचित. पण अस्तित्व मात्र उरतं.
अस्तित्व उरतं म्हणजे काय? आपण उरतो?
आपण म्हणजे जर हे शरीर, हाडकं, रक्त-मांस नसूच - तर आपण काय असतो? आपल्या माणसांच्या ऊष्ण आठवणी? आपण म्हणजे आपल्या कृतींचे कुणीतरी लावलेले अन्वयार्थ केवळ? किती भीषण आहे हे?
'एक दिन अचानक’ म्हणून एक सिनेमा पाहिला होता मृणाल सेनांचा. एक दिवस घरातला कर्ता पुरुष संध्याकाळी घरी परततच नाही. संध्याकाळ उलटते. रात्र होते. काळजीनं कुळकुळत रात्रही संपते. शिळी दमलेली सकाळ. काळजी. पोलिसांकडे नोंदवलेली तक्रार. ठिकठिकाणी केलेली शोधाशोध. कासावीस होऊन केलेली विचारणा. ढुंढाळलेल्या विहिरी. इस्पितळं. स्टेशनं. हाती आलेली रिकामी निराशा.
अशा अनेक संध्याकाळी. रात्री. सकाळी. उदासवाण्या - आशाळभूत.
आता घरानं प्राक्तन स्वीकारलं आहे त्याच्या पुरुषानं त्याच्याकडे पाठ फिरवल्याचं. पण तरीही अद्याप आशा पुरती मेलेली नाही. धुगधुगी आहे तिच्यात अजुनी. अजून कातरवेळेला जीव हुरहुरतो. चपलांची विशिष्ट करकर ऐकू आली, तर मन उशी घेतं. वरणाला फोडणी देताना अजुनी लसूण पडत नाही हातून. ’ह्यांना नाही चाल-’
चितेला अग्नी देताना, शरीराला मूठमाती देताना, अस्थी गंगेत विसर्जित करून पाण्याकडे पाठ फिरवताना हीच हुरहुर विसर्जित होत असेल? असण्याच्या आशांना चूड लागत असेल? अभाव चरचरीतपणे अधोरेखित होत असेल? काय होत असेल नेमकं?
पार्वतीबाईंचं काय झालं असेल?
त्यांचा कर्तासवरता नवरा असाच एकाएकी होत्याचा नव्हता झाला की. आत्ता होता - आत्ता नाही.
चुडा फोडू? भरलं कपाळ पुसू? मंगळसूत्र काढून ठेवू? असं कसं? अजून इकडच्या स्वारीचा देह नाही पाहिला, आणि हे काय भलतंच अभद्र? कुठे असतील ते - मी सधवेची विधवा होऊन त्यांना अपशकुन करू?
बाई आयुष्यभर अशीच जगली...अहेवपणाची लेणी लेऊन.
तिच्या मनात कातरवेळेला काय दाटलं असेल? अशुभाचा निर्वाळा देणारं आपलंच मन तिनं कसं घट्ट केलं असेल? रोज वेणीफणी करताना कुंकवाच्या करंड्यात बोटं थबकत असतील तिची? आणि जर तिला खरीच असेल खात्री सदाशिवभाऊंच्या जिवंत असण्याची, तर तिनं मनोमन साधला असेल संवाद त्यांच्याशी? काय बोलली असेल ती?
तिच्या रक्तामांसाच्या अपेक्षा होत्या जोवर, तोवर भाऊ होतेच. त्यांचं श्राद्ध झालं नव्हतं तोवर...
श्राद्ध.
हेसुद्धा आपल्याच आग्रहाला मूठमाती देण्यासाठी केलेलं कर्मकांड काय? जाणारा जीव जातो. त्याची माती होते. पण मागे राहणाऱ्यांचं काय? जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय?
म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी.
ज्यांना ही कर्मकांडं लाभत नाहीत, त्यांना खरंच नसेल येत पुरतं मरण? अशी माणसं भाग्यवान म्हणायची की अभागी?
सालं कुणाला न कळवता मरूनच पाहिलं पाहिजे एक दिवस.

Thursday 3 July 2008

वक्त जाता सुनाई देता है...


कंटाळा. जडशीळ. सुस्त. निर्लज्ज बधिर कंटाळा. बघावं- तिकडे पसरलाय.
व्यायाम?
हो, केला की.
आरोग्यपूर्ण खाणंपिणं?
हो तर. सलाड, पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यापर्यंत.
फोनवरच्या निरुद्देश गप्पा?
एकदम बंद. कामाखेरीज एरवी फोन बंद म्हटलं ना.
चांगलं वाचत जावं मग.
अर्थात. स्फूर्तिदायक चरित्र, चेतन भगती पुस्तकं, झालंच तर हॅरी पॉटर. चालू आहे रतीब.
मग येतात कसे उठल्या-सुटल्या कंटाळे तुम्हांला? आम्हांला नाही आला तो कधी कंटाळा? आम्हांला वेळच नसतो ना कंटाळायला.. चोवीस वर्षं नोकरी केली. पण म्हटलं का कधी कंटाळा आला म्हणून? गेलोच की नाही चुपचाप कामावर? तरी बरं आम्हांला जीव रमवायला एवढी साधनं नव्हती. टीव्ही म्हणू नका, डीव्हीडी प्लेयर म्हणू नका, मोबाईल म्हणू नका, लॅपटॉप म्हणू नका. कशाला म्हणून कमी नाही. तरी आपलं उठल्या-सुटल्या आहेच – कंटाळा आला. अरे? काही नाही – भरल्या पोटाची दु:खं आहेत झालं. बाहेर जाऊन पाहा जरा...
याला आता अंत नाही. अगदी ऐकायचा कंटाळा येईपर्यंत –
तरीही कंटाळा उरलाच आहे अजगरासारखा निवांतपणे. थोडंथोडं खाऊन संपवतो आहे जगणं. निर्जीव तरी कसं म्हणावं याला? पोसत चालला आहे साला माझ्या आयुष्यावर. उदासवाणा वांझोटा लठ्ठ कंटाळा. पसरला आहे सगळीभर.
ऑफीसमधे अजून थोडं काम. भरपूर स्ट्रेचिंग. नवीन निर्बुद्ध कल्पना. चेहऱ्याला पावडर थापलेली अजून काही संभावित राजकारणं. थोडं कौतुक. पगारवाढीचा तुकडा झेललेला. वीकेण्डची अंतहीन झोप. शिळवटलेला सोमवार आणि फसफसलेला शुक्रवार.
नवीन सिनेमे, तीच प्रेमगीतं, तोच अन्यायाविरुद्ध लढा. तीच सिनेमॅटिक लिबर्टी. तोच विरह. तेच पुनर्मीलन. तेच उदात्तीकरण. तीच स्टाईल. तीच सुरुवात नि तोच शेवट.
नवीन पुस्तकं. अफगाणी स्त्रियांनी भोगलेला छळ. प्रसिद्ध लेखकांच्या बायकांनी सोसलेली मुस्कटदाबी. कॉलसेंटरमधली स्मार्ट प्रेमप्रकरणं. महाभारताचे नवीन अन्वयार्थ. ब्राह्मणी आणि दलित आणि दलित आणि ब्राह्मणी आत्मचरित्र. अजून कुठल्यातरी प्रसिद्ध देशाचं चटकदार-संस्कृतिपूर्ण ’ललित’ प्रवासवर्णन.
कवितांमधूनही साला कंटाळाच पसरलेला असावा?
एखाद्या सराईत बाजारू कवितेसारखा लांबलचक. घामट. वळवळणारा. चराचर व्यापून उरलेला. अश्लील कंटाळा उतरलाय सगळ्यावर.
कुठल्यातरी नागिणीनं नागाच्या मृत्यूचा सूड घेतल्याची बातमी झळकतेय दिवसभर टीव्हीवर. कुणीतरी महाराष्ट्राची महागायिका झालीय. अमेरिकनं कुणाच्या तरी युद्धखोरीचा निषेधही चालवला आहे सकाळपासून. शनी उद्यापासून मिथुनेत शिरणार म्हणून बोलावलेले एक तज्ज्ञ ज्योतिषी शनीच्या पीडेवर उपाय सांगतायत. कुणीतरी प्रियकराच्या खुनाचा कट करतं आहे. कुणीतरी शिरा ताणताणून करतं आहे कुणावरतरी भ्रष्टाचाराचा आरोप. कुणाचा खून, कुणावर बलात्कार. कुणावर ’बिनबुडाचे’ आरोप.
टीव्ही साला अथक गळतो आहे.
पाऊसही.
शहर बंद पडायला आलं आहे तरीही गळतोच आहे पाऊस निर्दयपणे. पाण्याचा जाड पोलादी पडदा. मातकटलेलं-गटारलेलं काळसर पाणी जिकडे तिकडे. आचके देऊन पडलेल्या लोकल्स. फलाटाच्या अपुऱ्या आसऱ्याला आलेली वळवळणारी आशाळभूत गर्दी.
तरीही पाऊस गळतो आहे.
आवाज नसलेला पावसाचा हिंस्र आवाज सगळं मिटवून टाकणारा. कुणाची वाट पाहण्यापुरतीही उसंत न देता भरत चाललेलं पाणी. शहराचे सगळे दोर कापत – गिळत जाणारा लोखंडी पाऊस.
आणि तरीही कंटाळा. सगळ्यासकट कंटाळा. एखाद्या भयप्रद श्वापदासारखा आसंमत गिळंकृत करून ढेकरही न देणारा...
कंटाळा.

Saturday 14 June 2008

पूर्ण भाग जाणारं पुस्तक

सगळं काही शेवटी आलबेल होतं. सगळ्या अडचणी सुटतात. सगळ्या अनाकलनीय कोड्यांची नीट संगतवार उत्तरं मिळतात. सगळ्या दुष्ट लोकांचं वाट्टोळं होतं. सगळ्या सज्जन लोकांचं अखेर यथासांग भलं होतं. नायकाला नायिका मिळते. ते एकमेकांवर संपूर्ण आणि सखोल प्रेम करू लागतात. आणि दोघे सुखाने नांदू लागतात.

असले शेवट असणारी पुस्तकं लिमिट डोक्यात जातात. काहीतरी उंचावरून खाली फेकून द्यावं, काहीतरी तोडून-मोडून-जाळून टाकावं, कुणाच्यातरी उगाचच कानफटात हाणावी, अश्या अनेक अनावर हिंसक इच्छा असल्या पुस्तकांचं शेवटचं पान संपवल्यावर जाग्या होतात. सगळं जग बेतशीर सुबकपणे आपल्या दीडवितीच्या शब्दकोड्यात चपखल बसवणार्‍या लेखकाची आणि वाचणार्‍या आपली दया-दया येते.

बाकी सगळ्याचं ठीक आहे. पण हॅरी पॉटरचं हे असं नेमकं कधी झालं?

नेमका पान क्रमांक वगैरे आता आठवत नाही.

उलट त्यातलं समांतर अद्भुत विश्व पाहिलं, तेव्हा भारावून जायला झालं होतं.

'मिरर ऑफ डिझायर'मधे साध्यासुध्या आरशासारखं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तर आपल्या अंतर्मनातल्या तीव्र इच्छा मूर्त झालेल्या दिसतात, हे कळलं तेव्हा त्यातल्या अर्थपूर्ण कल्पनेची भन्नाट मजा वाटली होती.

'विझार्ड नेव्हर चूजेस वॉण्ड, इट्स दी वॉण्ड हू चूजेस दी विझार्ड' हे अजब वाक्य वाचलं, तेव्हा चक्रावून जायला झालं होतं. पण मग त्यातून छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला.

'सॉर्टिंग हॅट'ची कल्पनाही अशीच अफलातून. आपल्याला जे व्हायचं असतं, ते आपल्याला होता येतंच. फक्त तितकी तीव्र इच्छा आणि निर्णयाचा ठामपणा असायला हवा, असं श्रीमंत तर्कशास्त्र सांगत होती बाई.

प्रत्येकाचा पॅट्रोनस फॉर्म (च् च्! पॅट्रोनस म्हणजे तुमच्या मनातल्या होकारात्मक भावनांनी तुमच्या वॉण्डमधून समूर्त होणं.) निरनिराळी रूपं घेतो इथवर ठीक आहे. पण लिलीवर नितांत प्रेम करणार्‍या स्नेपच्या पॅट्रोनसनं लिलीच्या पॅट्रोनसचा आकार घ्यावा? हे अद्भुत होतं.

राक्षसाचा प्राण कुठल्यातरी पोपटात असण्याची कल्पना आपल्याला कुठे नवीन होती? त्याच धर्तीवर व्होल्डरमॉटनं आपल्या जिवाचे सात तुकडे केले आणि अमर होण्याकरता ते कुठेकुठे दडवून ठेवले. पण त्याच्या जिवाचा एक अंश असावा चक्क हॅरीमधे. आणि त्यातून त्या दोघांमधे एक जिवंत दुवा निर्माण व्हावा? बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं.

प्राणिसृष्टी म्हणू नका, भाषा म्हणू नका, मंत्र म्हणू नका, खेळ आणि विज्ञान म्हणू नका... एक संपूर्ण नवीन विश्व.

सर्वसाधारण कल्पना जर एकरेषीय असतील, तर हे कल्पनेचं विश्व म्हणजे एखाद्या प्रसरणशील ताकदवान विस्फोटासारखं होतं. दाही दिशांना विस्फारणारं. विस्फारत राहणारं.

दुर्दैवानं ते तसं राहिलं नाही. दर गोष्टीचा एक साचा ठरत गेला. नियम बनत गेले. दर वर्षी काहीतरी संकट यावं. हॅरीनं त्यावर मात करावी. सरतेशेवटी प्रोफेसर डंबलडोरनी सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची संगतवार उत्तरं द्यावीत... सगळं कसं संतापजनक प्रेडिक्टेबल होत गेलं. शेवटच्या वर्षी हॅरीनं व्होल्डरमॉटवर मात केल्यावर त्याचं गिनीशी लग्न व्हावं, त्याला तीन मुलं व्हावीत (दोन मुलगे आणि एक मुलगी!) आणि त्यातल्या एकाचं नाव 'अल्बस सिव्हेरस' असावं हा तर गलिच्छपणाचा कळस होता.

अखेरशेवट हॅरीला पूर्ण भाग गेलाच.

फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो.

एरवी खरंतर एखाद्या संख्येला पूर्ण भाग गेलेला मला आवडतो. सगळं आलबेल चालू असल्याचा, सगळ्यावर आपला ताबा असल्याचा, सगळं नीट आवरून ठेवल्याचा एक फील येतो...

पण पुस्तकं, सिनेमे आणि माणसं? त्यांना पूर्ण भाग न जाण्यातच गंमत आहे.

Monday 19 May 2008

गरज

१. 'साले माजलेत...' या उक्तीखेरीज ज्यांचं वर्णन अपुरं ठरतं असे रिक्षावाले.
२. जुनी, पिवळी पडलेली पुस्तकं मेहेरबानी केल्याच्या थाटात पुरवणारं सरकारी वाचनालय आणि तिथले कर्मचारी.
३. सदैव कशासाठी तरी उकरून ठेवलेले आणि ट्रॅफिकनं बुजबुजलेले रस्ते, झाकणं चोरीला गेलेली गटारांची असहाय्य तोंडं, उखडलेल्या लाद्या, भाजीवाल्यांनी आणि पायरेटेड सीडीवाल्यांनी हक्कानं व्यापलेले फुटपाथ.
४. रात्री अडीच वाजताही आश्चर्यकारक गर्दीनं ओसंडणारं रेल्वे स्टेशन.
५. एखादी सीडी सापडेनाशी झाल्यावरच ज्याची नाईलाजानं साफसफाई होते आणि ती करताना त्या सीडीखेरीज आवळ्याच्या बिया, अमृतांजनची बाटली, दोन महिन्यापूर्वीच्या 'लोकरंग'चं मागचं पान, खंडीभर जळमटं-धूळ-गुंतवळ एवढा सगळा ऐवज बक्षिसासारखा मिळतो, तो आपला थकेला दमेकरी पीसी.
६. दर आठ दिवसांनी थपडा मारल्यावर एकदम मख्खनके माफिक चालणारा, भांडताना निमित्त आणि मारामारी करताना हत्यार अशी दुहेरी सर्व्हिस देणारा, खिळखिळा झालेला टीव्हीचा रिमोट.
७. खूप वापरल्यामुळे बांधणी सैल झालेली पुस्तकं, त्यांची कोपरे दुमडलेली मुखपृष्ठं आणि कसल्याही संदर्भाखेरीज लख्ख आठवून येणार्‍या अधल्यामधल्या ओळी.

माणसांपेक्षाही जास्त तीव्रतेनं या गोष्टी नुसत्याच आठवतात आणि त्यांचा नेहमीइतका राग न येता नुसतीच लख्ख आठवण येतच राहते तेव्हा -

मनसे आणि राज ठाकरेबद्दल शरम, राग आणि संभ्रम हे सगळं एकदम वाटतं, तरीही त्याच्यात आणि आपल्यात असलेला मराठी असल्याचा धागा नाकारता येत नाही आणि इतके दिवस घट्ट असलेली आपली भूमिका भौगोलिक जागा बदलल्यामुळे एकाएकी डळमळीत होऊन अस्थिर झाल्यासारखं वाटतं तेव्हा -

'आयपीलमें किसे सपोर्ट कर रही है? मुंबई या बेंगलोर?' या मुंबईस्थित बिहारी मित्राच्या प्रश्नावर 'अर्थात मुंबई, काय आचरट प्रश्न आहे हा!' हे तोंडावर आलेलं उत्तर मागे परतवून 'हॅट, आय डोण्ट फॉलो आयपील. वोह क्या क्रिकेट है?' हे पायाभूत डिप्लोमॅटिक उत्तर आपसूक दिलं जातं तेव्हा -

घाम न येण्यातली प्रचंड सोय जाणवण्याचे दिवस मागे पडून 'छे, अशानं वजन कमी कसं होणार', 'उष्णतेचा त्रास होतो ब्वॉ फार', 'कायच्या काईच हवा ही.. सतत बदलणारी...' अशी कुरबुर आपोआप तोंडून बाहेर पडायला लागते तेव्हा -

'आयटी हब' असलेल्या शहरातल्या कौतुकाच्या बागा म्हणजे 'फुकट पोसलेले पांढरे हत्ती आहेत..' असं सिरियसली वाटायला लागतं,

अनिश्चित-अवाजवी ट्रॅफिक जॅम्सचा वैताग येऊन आपण रविवार घरीच लोळून काढायला लागतो,

'हे कसली मॉल्सची कौतुकं सांगतात आम्हांला? आमच्याकडे येऊन पाहा एकदा...' हे वाक्य लोकांच्या सनातनी मेण्टॅलिटीपासून ते विमानतळाच्या स्वच्छतेपर्यंत कुठल्याही गोष्टीला चपखल बसायला लागतं,

'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...' या कुणाच्याश्या दाव्यावर तोंड उघडण्याचीही तसदी न घेता मनात फक्त कुत्सित हसणं उमटतं,

मीटरप्रमाणे बत्तीस रुपये होणार्‍या ठिकाणी रिक्षावाल्याच्या हातावर ठरल्याप्रमाणे पन्नास रुपये टिकवल्यावर, तो 'और दस रुपया मॅडम. अभी साडेदस बज गया' असं अत्यंत निरागस-निर्विकारपणे म्हणतो. मामाला वचकून असणार्‍या मुंबईतल्या रिक्षावाल्याच्या आठवणीनं गहिवरावं की जिभेवर आलेली पाच अक्षरी कचकचीत शिवी आधी मागे सारावी, हे न कळून आपण हतबुद्ध होतो तेव्हा -

तेव्हा समजावं -

घरी एक पखालफेरी मारून येण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याखेरीज पुरोगामी आधुनिक ग्लोबल नागरिक म्हणून आपलं निभणार नाही...

Wednesday 23 April 2008

वार्‍याने हलते रान...

सहसा काम करण्यासाठी ही अशी जागा मिळणं दुरापास्त.

दोन्ही टोकांना धडधडणार्‍या शहरांच्या मधे वसलेला हा निवांत पट्टा. कसलेच गज नसलेली मोठ्ठीच्या मोठ्ठी सरकखिडकी. समोर खाडी. खाडीला समांतर जाणारे निर्लेप संन्यस्त रूळ. अद्याप माणूसपणा शाबूत असलेला शांत फलाट. खाडीचं वेळीअवेळी चमचमणारं-ओसरणारं पा़णी.

त्या पाण्यावर जगलेलं हे मोकाट रान. जिवंत, श्वास असणारं.

त्या रानाला चक्क रानाचा असा हिरवा-ओला वासही येई. त्याचा रानगट हिरवेपणा, पावसाळ्यात ओसरून जाणारं त्याचं शहरीपणाचं भान, त्याला अगदी क्वचितच होणारा चुकार माणसाचा स्पर्श आणि तिथले ते काव्यात्म गूढ बगळे. या सार्‍यावर पाऊस कोसळे, तेव्हा तिथल्या जडावलेल्या रानवट शांततेत आपणच उपरे असल्याचं निर्दय-तीक्ष्ण भान देत जात असे ते रान.

रान नजरेच्या पातळीला असतं, तरी त्याचा स्पर्श असा हाताच्या अंतरावर भासला असता. आणि मग त्याची कळे न कळेशी दहशतही वाटली असती कदाचित. पण माझ्या खिडकीनं मला निराळीच जागा बहाल केलेली. एरवी आपल्या भासमय अस्तित्वानंही धडकी भरवू शकले असते असे अनेक सळसळते स्पर्श, खसफसणारे आवाज आणि तो ओलाकंच गंध - सगळंच मला माझ्या खिडकीतून एक निराळीच मिती दिल्यासारखं दिसे.

जिवंत. पण दूरस्थ.

मी पावसाळ्यात गेले तिथे. म्हणूनच बहुधा - त्या खिडकीचं, त्या रुळांचं, त्या रानाचं आणि पावसाचं एक अनाम नातं रुजून राहिलेलं माझ्याआत. आतल्या एसीची पर्वा न करता बिनदिक्कत खिडकी उघडून पाऊस अंगावर घेतला, तेव्हाच जुळत गेली तार कुठेतरी. मग पाऊस ओसरून गवताचा रंग मालवत गेला, तरीही आमची ओळख राहिलीच. मागच्या बाजूच्या अव्याहत धडधडणार्‍या आकर्षक महारस्त्याकडे पाठ फिरवून माझं इमान रानाशीच राहिलं.

पण हे जाणवलं मात्र खूप उशिरा.

***

तेव्हा कुणाशी नीटशी ओळखही नसलेली. समोर तेवणारा कॉम्प्युटर आणि शेजारची खिडकी. इतकंच असत असे जग आठ तासांपुरतं. कितींदा तरी नकळत नजर खिडकीतून बाहेर लागून राही. कोसळत्या पावसाचा जाड धुकट पडदा, आतली बर्फगार यांत्रिक थंडी आणि बर्‍याचदा भिजून ओलेगच्च झालेले निथळणारे कपडे. तरी पावसाआडून गप्प-गंभीर रान खुणावत राही. सगळे अपमान-उपेक्षा-एकटेपणा त्याच्याकडे पाहत असताना मृदावून जात. त्या तिथून पाहताना लोकल ट्रेनही कसली तत्त्वचिंतक स्वभावाची वाटे... मला दिसे ती शहराकडे पाठ फिरवून निघालेली ट्रेन. गर्दीच्या वेळाही नसत. कुणी एखादा वारा पिऊ पाहणारा दारात लटकणारा कलंदर आणि रिकामी धडधडणारी ट्रेन. तिच्याकडे पाहताना अलिप्त शांतसे वाटत जाई. ते गप्प रान आणि तिथून जाणारी ती ट्रेन. त्या रानापाशी आसरा घेण्याची आणि ट्रेनची वाट पाहण्याची सवय कधी लागली कळलंच नाही.

आजूबाजूच्या माणसांना तर पुठ्ठ्याचे कट-आउट्सच मानत असे मी त्या काळात.

रान तेवढं मनात नकळत मूळ धरून राहिलेलं.

***

आमच्यात अंतर कधी पडत गेलं ते आता नीटसं आठवत नाही. खरे तर त्या काळातले रानाचे तपशीलच फारसे आठवत नाहीत. तेव्हा माणसं असायला लागली होती आजूबाजूला.

माझं लक्ष नसतानाच कधीतरी पाऊस ओसरत गेला... रानाचा रंग बदलत गेला. तिथली गंभीर हिरवाई वितळून उन्हाळत गेलं रान हळूहळू. त्याचा तो ओला-पोपटी वास एक दिवस नसलेलाच. त्याचं माणूसघाणेपण संपल्यासारखं. कुणी कुणी चक्क चार-दोन गुरं चारायला आणलेली रानात. पातळ मखमली पंखांची सोनपिवळी फुलपाखरंही चक्क. टायर पिटाळत त्याच्यामागे धावणारी चार कारटी आणि त्यांना उंडारायला एका पायवाटेपुरती जागा करून देणारं रान. हसर्‍या तोंडावळ्याचं. गुरं-पाखरं-पोरं-फुलपाखरं खेळवणारं. माणसाळलेलं.

त्याच्या त्या बदललेल्या चेहर्‍याची दखल जेमतेमच घेण्याइतपत फुरसत होती असावी मला. काम, माणसं आणि मैत्र्याही रुजत गेलेल्या. त्या काळात रानाशी केलेली बेईमानी आणि महारस्त्याकाठचा सज्जाच आठवतो. वाहत्या रस्त्यावरचे फर्र फर्र आवाज - त्या आवाजांना पचवून उरणारी निखालस शांतता - भणाण वारा आणि उडणारी ओढणी - गप्पांच्या साथीनं रिचवलेले असंख्य बेचव चहाचे कप. मोकाट गप्पांचे दिवस.

मानवी नेपथ्यानं जिवंत नटासाठी काही काळ निर्जीव होऊन उरावं तसं उरलं होतं तेव्हा रान. समंजस मित्रासारखं. काही न मागता अबोल साथ पुरवणारं. पण बिनबोलता नकळत बदलत जाणारं.

***

त्याच्या बदलण्याची खरी चरा उमटवणारी दखल घेतली ती तिथल्या मोकाट गवताला एके दिवशी आग लागल्यावर. रान चुपचाप बिनविरोध माघार घेत गेलेलं. आणि मोकळं होत जाणारं माळरान.

धस्स झालं होतं. आणि आपणच आपल्याशी केलेल्या बेईमानीची कडू जाळती जाणीवही.

तोवर वेळ निघून गेली होती पण. हळूहळू रान मागेच सरलं निमूट.

मग काही माणसांचे जथ्थे. काही पालं. काही फरफरणारर्‍या चुली. काही झोळ्यांचे पाळणे. अजून काही माणसं. काही ट्रक. काही घमेली आणि फावडी.

मग थेट वीटभट्ट्याच.

***

आता उरल्यासुरल्या रानावर पाऊस कोसळत असेल. रान पुन्हा एकदा असेल गप्प-गंभीर-उदास. इथेही पाऊसच...

मला आठवताहेत त्यानं दिलेले काजवे. काही चुकार फुलपाखरं. एक लखलखतं दुहेरी गोफाचं इंद्रधनुष्य.
आणि दु:खासारखी सखोल घनगंभीर साथ.

एक आवर्तन पुरं झालेलं आता. माझंही...

रानाला काय आठवत असेल? आता खिडकीत उभं राहून रानाला साथ कोण पुरवत असेल?

Wednesday 16 April 2008

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत...

आजच्या संध्याकाळीला भेसूर चेहरा नाही.

नाही. कसलाच तात्पुरता मुखवटाही नाही.
वेळ भरत राहण्याचा, स्वतःपासून पळत राहण्याचा शाप नाही.
दिवस पुरता अर्धमेला झाल्यावरच घराकडे परतण्याचा धाक नाही.

नाही. ही सवयही नाही.

अजुनी संध्याकाळ जिवंत असण्याची संपली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीचं अप्रूप.

सवय? माणसाला कसलीही सवय होते.
घेट्टोमध्ये मरण उद्यावर ढकलत राहण्याची.
मृत नात्यांमध्ये पेंढा भरत राहण्याची.
मरेपर्यंत जगत राहण्याची.

ती सवय. ही सवय नव्हे.

अजून तरी संध्याकाळ म्हणजे अनामिकानं भयभीत होऊन देवाच्या दगडापाशी शरण जाण्याची वेळ झाली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीच अप्रूप.

तश्या संध्याकाळी होत्याच जिवंत माझ्याआत. असल्या-नसल्या सगळ्यासकट अंधारात उडी मारताना. रसरसून पेटून जगताना. वैराण उद्ध्वस्त होत जाताना. गुलाबी फुलांच्या नसतील. धगधगत्या केशरी जाळाच्या असतील. पण जिवंत होत्या. म्हणून तर दर दिवशी त्यांना तोंड देताना थकून जायला होई. वाटे, यातून कधी सुटका होणार की नाही? किती काळ हे असं केसर-जाळाचं आयुष्य? कधीतरी ताकद संपेल. कधीतरी थकून, भिऊन आपण कासवासारखे मिटून घेऊ स्वतःला. एखाद्या संसारी स्त्रीसारखी संध्याकाळीच्या थडग्यावर दिवेलागणीचा दिवा लावून स्वतःची सुटका करून घ्यायला शिकू. कातरवेळ मरून जाईल... निबर होऊ आपण...

तशी आजची संध्याकाळही संपूर्ण जिवंत. पण तिचा चेहरा भेसूर नाही.

माझ्यातली सगळी दमणूक शोषून घेत,
कलत्या उन्हाची जादू पुन्हा बहाल करत,
त्या मऊ प्रकाशाला कोवळे उत्कट सूर पुरवत.
जिवंत पावलांनी, उष्ण-सुखद श्वासांनी,
अंगणात उतरलेली संध्याकाळ.

अपुरेपणाचं भय न दाखवता त्यातल्या जिवंतपणाचं आश्वासन देणारी संध्याकाळ.

अशा निरामय वेळेसाठी कृतज्ञ तरी कुणाचं असायचं असतं?

कदाचित अशा वेळेसाठीच शब्द खोदून गेलेल्या त्या कवीचं.

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही,
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे,
तोवर आम्हांला एकमेकांशी अबोला धरण्याचा अधिकार नाही...

...या आयुष्यात खोल बुडी मारून आलेला एखादा,
सर्वांना पोटाशी धरणारा कुणीतरी,
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे...

Thursday 10 April 2008

क्यूँ नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे...

क्युबिकलमधे हातपाय झाडून त्याला 'एरोबिक्स' म्हणायची सवय लावून घेऊन तसे बरेच दिवस झाले.
ते करताना चेहरापण निर्विकार ठेवता येतो आता.
भिवया उंचावल्या जात नाहीत आणि फिस्सकन हसायला येणार नाही याचीपण ग्यारण्टी देता येते.
जेवायला जाताना अडीच सेंटीमीटरचं स्माइल, 'बाय' म्हणताना दीड सेंटीमीटर पुरे.
येताजाता लोकांना 'हाय' न करता 'ब्लिंक' केलं तरी चालतं.
आपण बरं, आपलं काम बरं.
एन्जॉय माडी...

असलं स्वतःचंच कौतुक करत करत परवा 'जेन फोंडा'गिरी पार पाडली.

आणि आपलं नाक दीड फूट उंचावर ठेवून अलिप्तपणे माणसांतून वाट काढत चालायला शिकलो आपण, अशी शाबासकी स्वतःला देण्याच्या बेसावध क्षणीच एरोबिक्स-बाईनं चांगलं साडेपाच सेंटीमीटरचं हास्य माझ्या दिशेनं फेकलं.

काही कळायच्या आत मी माझ्याच खांद्यावरून मागे पाहिलं.

तिथे कुणीसुद्धा नाही, हे कळल्यावर मात्र मी दचकले.

म्हणजे... मला?
का बाई?
मी काय केलंय?
माफ कर...

असे विचार डोक्यात येतात न येतात तोच तिनं मोर्चा माझ्याकडे वळवला. मी कोण-कुठची, मी कित्ती मनापासून व्यायाम करते (हो? असेल बाई..), माझं स्माईल किती गोड आहे (...) वगैरे वगैरे पायर्‍या यथासांग पार पडल्या आणि मग जवळ जवळ रोज बाईंसोबत कॉफी घेणं आलंच.

कॉफी. थोड्या कोरड्या गप्पा. थोडं हसणं. ओळख. मैत्री...?

शिट्...

नाही नाही म्हणताना किती लोकांशी ओळखी झाल्या अशा.

'ठाणे. प्रमोद महाजन का भाई रहता था वहॉं. पता है?' या माझ्या प्रश्नाला 'मुंबई-ठाने. भारत की पहली लोकल ट्रेन. सन अठ्ठारासो तिरपन,' असं उत्तर देऊन माझी विकेट घेणारा एक बिहारी.

'भुस्कुटे म्हणजे....' असं विचारत हेतुपूर्वक थांबून, मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर नाईलाजानं कावरंबावरं हसून, पुढे ओळख करून घेणारी एक मराठी मुलगी. अर्थात - महाराष्ट्राचा कोस्टल एलिमेण्ट!

'क्या? अस्सी हजार? तेरे पापा देंगे इतना डिपॉझिट? चल, मैं बात करवाती हूं सस्तेमें...' असं झापणारी एक दिल्लीकर पोरगी.

दुसर्‍याच रात्री कॅबमधून परतताना अंमळ जास्तच वेळ खिडकीतून चंद्र पाहिला, तर 'होमसिक झालीयेस?' असं मराठीतून विचारून मला दचकवणारा एक मराठी कलीग.

या सगळ्यांना निकरानं टाळता टाळता माझ्या जुन्या ऑफीसमधल्या मित्रांशी किती गप्पा मारल्या मी मनातल्या मनात.

माझे सगळे नखरे- सगळी नौटंकी किती सहज चालवून घ्यायचात तुम्ही.
इथे जेवता जेवता तेव्हा खास माझ्यासाठी आणलेल्या खरड्याची चव आठवते आणि जेवण कडू होतं.
आता इथल्या रिकाम्या संध्याकाळच्या गर्भार वेळी बांग ऐकताना त्या सगळ्या जिवंत संध्याकाळींची तलवार टेकलेली राहते गळ्यापाशी.
संध्याकाळ. तिला तरी कशाला बदनाम करावं फक्त?
आठवणींना काय प्रहर असतात?

दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत मला सूर्यनमस्कार घालून दाखवणारा आणि 'बघू नका फक्त. करा. करा,' हे वर ऐकवणारा माझा बॉस.

प्रेझेण्टेशनच्या वेळी माझ्या चेहर्‍यावरचं टेन्शन वाचून एका मित्रानं केलेला मेसेज - 'टेक अ डीप ब्रेथ ऍण्ड से लाउडली - भोसड्यात गेली कंपनी...'

एका आत्यंतिक किचकट प्रॉब्लेमवर काम करावं लागू नये म्हणून माझ्याशी लपाछपी कम् पकडापकडी खेळणारे दोन वेडसर मित्र.

'का कंटाळलीयेस इतकी? चल, आइसक्रीम खाऊया?' असं विचारून मला ऑलमोस्ट रडायला लावणारा एक मित्र.

मला साडी नेसलेली पाहिल्यावर हसून गडबडा लोळण्याची ऍक्टिंग करणारा एक मित्र.

शेवटच्या दिवशी मला एकटीला जराही वेळ न देता अखंड बडबड करणारा, जाताना मला घट्ट मिठी मारणारा एक मित्र.

माझं क्युबिकल.
माझा पीसी.
माझी खिडकी.
खाडीचा खारा वारा.
लांबवरचं जिवंत-निवांत शहर.
तिथवर नेणारे ते फिलॉसॉफिकल रूळ...

उफ्फ्...

आता मात्र नाही.
मी मुद्दामहून तुलना करीन दुष्टपणानं यांची त्यांच्याशी.
मुद्दामहून कुचकटपणानं वागीन.
तुसडेपणा करीन.

पण आता नाही. परत नाही.

कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार.

मग कितीही सेंटीमीटर हसा.
पण लांब असा. सुरक्षित अंतर राखून असा...

Friday 4 April 2008

वेळ

शब्द म्हणजे निव्वळ चिखल असं वाटण्याची वेळ येतेच,
आजची वेळ त्यातली.

जगातले यच्चयावत हिंदी सिनेमे,
सगळीच्या सगळी आयन रॅण्ड,
पाऊस, संध्याकाळ, भण्ण दुपार.
ही सारी आपल्या रक्तातली निव्वळ बेअक्कल,
असंही वाटण्याची वेळ येतेच.
शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.

ही विषकन्येसारखी आकर्षक जीवघेणी वेळ.
तिला स्पर्श करण्यासाठीही शब्दांचंच शरीर?
एखाद्या वखवखलेल्या ब्रह्मचारी बैराग्याचं प्राक्तन...
हे देहाला शरण जाण्यातलं वैफल्य?
की शरीराच्या सगळ्या सामर्थ्यांचे उत्सव?

उत्तरं फेकून मारता येतात,
तरी प्रश्न मरत नाहीत.
रस्ते चुकवता येतात,
देणी मात्र चुकत नाहीत...
ही समजूत रक्तात रुजून येण्याची वेळ कधी ना कधी प्रत्येकावर येतेच.
आजची वेळ त्यातली.

शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.
आजची वेळ त्यातली.

Sunday 30 March 2008

नाटक

सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

तुपकट लग्नसमारंभी उत्साह. नाटकाच्या वेळाशी अजिबात देणंघेणं नसल्यासारखी निवांत सरबराई. खाणं-पिणं, साड्यांचे लफ्फेदार पदर, गजरे-अत्तरं आणि भेटीगाठी. आता आलोच आहोत तर बघून टाकू नाटकपण, असा एकंदर नूर आणि आव मात्र संस्कृतीच्या जपणुकीची धुरा वाहायची असल्याचा. साधे मोबाइल्स सायलेण्ट मोडवर टाकण्याचं सौजन्य नाही. मग 'नाटकानंतर भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे', 'मंडळाचे सदस्य श्री. अमुक अमुक यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं' आणि 'आपल्यासोबत राहुल द्रविडचे आई-वडीलही नाटकाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत...' हे सगळं नाटकाच्या अनाउन्समेण्टसोबत हातासरशी उरकून घेणं आलंच.

अशा ठिकाणी हे इतपत चालायचंच, असं हजार वेळा स्वतःशी घोकूनही माझा चरफडाट थांबत नव्हता. त्यात पडदा उघडला, तरी चार-दोन चालूच राहिलेल्या दिव्यांची आणि नि:संकोच उघडमीट करणार्‍या दाराची भर.

पडदा उघडल्यावरही ही चिडचिड निवळावी असं काही घडेना. बोट ठेवायला तशी जागा नव्हती. चोख पल्लेदार आवाजातले संवाद. सहज वावर. विषयाला साजेसं नीटनेटकं नेपथ्य. आता प्रेक्षागृहात तशी शांतताही. पण कशात काही जीव म्हणून नव्हता. सगळं लक्ष एकवटून त्यात जीव रमवण्याचा प्रयत्न करूनही काही साधेना. हे सगळं कमी झालं म्हणून मधेच एकदा लाइट गेले. एकदा नटाची मिशी सुटली आणि सरळ माफी मागून तो ती लावायला आत निघून गेला.

मी आशा जवळपास सोडून दिलेली.

त्या प्रयोगाबद्दल खरं तर पुष्कळ वाचलं-ऐकलं होतं. त्याच्या विषयाचा वेगळेपणा. आशयाची ताकद. सापेक्षतावाद आणि जागतिक शांततेसारखे ऑलमोस्ट किचकट आणि गंभीर विषय असूनही एकाच पात्रानं ते पेलण्यातला करिष्मा.

पण सगळं समोर मांडलेलं असूनही कलेवरासारखं निष्प्राण. सोन्यासारखी रविवार सकाळ, ट्रॅफिकमध्ये तपःसाधना करून काढलेला दीड तास, न केलेला नाश्ता आणि काहीही कारणाविना डोळ्यांदेखत खचत गेलेल्या अपेक्षा. पाट मांडून रडावं की कसं, असं वाटायला लागलेलं. इतकी निराशाजनक परिस्थिती बदलू शकते असं मला कुणी म्हणालं असतं, तर मी त्याला सरळ आनंद नाडकर्णींकडे शुभार्थी म्हणून काम करायला रवाना केलं असतं.

नेमकं काय बदललं विचाराल, तर ते नाही सांगता येणार. डोक्यात जाणार्‍या मागच्या बाईच्या कुजबुजीपासून पंख्याच्या कुईकुईपर्यंत सगळं तसंच होतं. पण एकदम हवेनं कात टाकली जणू. नटाचा आवाज नेम धरून मारलेल्या एखाद्या भाल्यासारखा आपला वेध घेणारा. त्याची तगमग त्याच्या बोटांच्या अस्वस्थ हालचालींमधून, त्याच्या ओठांच्या सूक्ष्म कंपामधून, त्याच्या डोळ्यांत तरळलेल्या पाण्यातून एखाद्या एक्स्ट्रीम क्लोज् अपसारखी अंगावर येणारी. त्याच्यावर खिळलेले डोळे इकडेतिकडे जाईनात. त्याच्या स्वरातल्या चढ-उतारासोबत श्वास खालीवर व्हायला लागलेला आपलाही.

आसमंत जणू कसल्याश्या अनामिक ताकदीनं भारलेला. नटाचं शरीर-त्याचा चेहरा-त्याचा आवाज. बस. इतकंच उरलेलं सगळ्या जिवंत जगात. सगळ्या नजरा त्या बिंदूशी कसल्याश्या गूढ ताकदीनं खेचलेल्या. ताणलेल्या. त्याच्या एका इशार्‍यावर जणू हे बांधलेले-ताणलेले नाजूक बंध तुटतील, अशा आवेगानं विस्फारलेल्या.

नट?

तो या खेळातलं बाहुलं असेल निव्वळ?

एखाद्या मांत्रिकानं प्रचंड ताकदीनं विश्वातलं अनामिक काही एखाद्या वर्तुळात बांधावं आणि त्या ताकदीचा ताण त्याच्या रंध्रारंध्रात जाणवावा - समोरची ताकद कधीही स्वैर उधळेल आणि उद्ध्वस्त होईल सगळं. कधीही काहीही होऊ शकतं आहे - हा ताण त्याच्या नसानसांतला. आणि तरीही त्याचा तिच्यावरचा ताबा सुटत नाही. तिच्यावर जणू स्वार झालेला तो. तिला हवी तशी नाचवतो आहे आपल्या तालावर. आपल्या शरीरातल्या कणान् कणाच्या ताकदीवर.

भारलं आहे या झटापटीनं आसमंतातल्या सगळ्या चेतन-अचेतनाला...

तो या अनामिक ताकदीला लीलया खेळवतो.

हसवतो. रडवतो. जीव मुठीत धरायला लावतो. सुटकेचा नि:श्वास सोडायला लावतो...

मंतरलेले आपण जागे होतो, तेव्हा पडदा पडणारा. नि:शब्द शांतता. आणि रक्तातली प्रचंड दमणूक.

प्रेक्षागृहातली ही जादू ओसरून लोक भानावर आलेले. 'हे काय घडून गेलं' या आश्चर्यानं बावचळलेले. खुळचट हसणारे. हळूहळू हालचाल करून आपल्याच हातापायांतली ताकद आजमावणारे. पांगणारे.

नट?

चुपचाप मिशी उतरवत होता. रंग पुसत होता. फुललेला श्वास आवरत होता.

म्हटलं नव्हतं? सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

Thursday 13 March 2008

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

डोक्याच्या तळाशी खळबळणारे काही प्रश्न आणि नुकतीच घडलेली काही निमित्तं. म्हणून हे इथं मांडते आहे. ब्लॉग लिहिण्याचा - खरं तर लिहिण्याचाच - खटाटोप करणार्‍या सगळ्यांनाच उद्देशून आहेत हे प्रश्न. काही अंदाज. काही बिचकते निष्कर्ष. काही निरं कुतुहल.

सहमत व्हा, विरोध नोंदवा, वेगळी मतं मांडा.... हे फक्त विरजणापुरतं -

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं हा प्रश्न कधी पडलाय तुम्हांला? लिहिणं आणि आपण यांच्यातले हे विचित्र संबंध नक्की काय आहेत, याचा छडा लावण्याचा फॅसिनेटिंग खेळ कधी खेळावासा वाटलाय?

सहसा असं दिसतं, की प्रचंड उंची गाठणार्‍या कलाकारांना निदान सुरुवातीच्या काळात तरी त्यांच्या माध्यमाखेरीज कशातच फारशी गती नसते. म्हणजे, जर कुठे 'अहं' गोंजारला जात असेल, तर तो तिथे. बाकी सगळीकडे नुसतंच हाड्-तुड् करून घेणं. हरणं. माती खाणं. मग आपोआपच माणूस आपल्या माध्यमाचा आसरा घेतो. तिथे अधिकाधिक रमत जातो. अभिव्यक्तीसाठी चॅनेल सापडत नाही, म्हणून ते माध्यमाकडे ओढले जात असतील, की माध्यमावर इतकी पकड आल्यावर काहीतरी ओकून टाकावं असं वाटत असेल? की दोन्हीही? की अजून काहीतरी निराळंच?

आणि इतक्या सरावाचं, सवयीचं, जवळ जवळ गुलामाइतकं पाळीव-इमानदार माध्यमही जेव्हा चॅनेल म्हणून अपयशी-अपुरं ठरत असेल तेव्हा?

तेव्हा स्वतःवरचा विश्वास उडावा इतकी टोकाची निराशा-चीड-हतबलता येत असेल? की त्याही परिस्थितीत कुठे तगून राहता येईल तर ते तिथेच, असं वाटून माध्यमाच्या कोशात दडी मारून राहावंसं वाटत असेल? अजून निराशा.. अजून चीड... अजून तगमग. आणि तरीही काय होतं आहे स्वतःला ते नाहीच धड गवसत. आत काय तडफडतं आहे, ते नाहीच बाहेर येत.

तेव्हा?

माध्यम आणि त्या माध्यमावर इतक्या अपरिहार्यपणे - एखाद्या अपंग मुलासारखे - अवलंबून असणारे आपण या दोघांचाही तीव्र स्फोटक संताप येत असेल? आणि या ठसठसणार्‍या दुखर्‍या ठणक्यातून उसळून येत असेल काही?

की दर वेळी हे इतकं इण्टेन्स, इतकं झांजावणारं काही नसतंच?कधी नुसताच इगो सुखावणं? माध्यमावरची स्वतःची हुकूमत अनुभवणं? 'सराईतपणा' एन्जॉय करणं?

नक्की काय? की सगळंच?

लिहिणं म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय?

माझा खो संवेदला.

***


हा खेळ खेळायला चढत्या क्रमानं मजा येतच गेली, येते आहे. खरं तर खेळ अजून संपला नाही. पण आता साखळी लांबत चाललीय. अजून बरीच मंडळी लिहितील. तोवर साखळी एका ठिकाणी सापडावी, म्हणून थोडा खटाटोप -
"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?" - संवेद
ठिपक्यांची न बनलेली रेषा... - ट्युलिप
मैंने गीतों को रच कर के भी देख लिया... - राज
I think, therefore... - सेन मॅन
फिर वही रात है... - मॉन्स्यूर के
माझिया मना जरा सांग ना... - विद्या
खो-खो, चिमणी, मंत्रा! - जास्वंदी
मी आणि पिंपळपान - संवादिनी
मी का लिहिते? - यशोधरा
जेव्हां माझ्या ego च्या हातून माझ्या id चं मानगूट सुटतं तेव्हां. - सर्किट

Wednesday 12 March 2008

ऋतू

इथे सध्या कुठला ऋतू आहे कुणास ठाऊक. पण हवा अगदी नितळ सुरेख आहे. दुपारी अडीचच्या सुमारास घरी परततानाही त्या स्वच्छ सोनेरी हवेची आभा सगळीभर पसरून असते. रस्त्यावर डेरेदार झाडांची कमतरता नाहीच. पण त्यांच्या हिरवेपणात तजेला तरी किती! उन्हानं नुसती झगमगत असतात. त्यांच्या हिरवेपणात ऊन मिसळतं आणि सगळ्याला एक झळझळता अनोखा रंग येतो. अशा कित्तीतरी रेखीव दुपारी काचबंद करून ठेवून द्याव्यात असं वेड्यासारखं वाटून जातं मग. हातातलं पुस्तक, डोक्यातले विचार, बाजूचे लोक... असं सगळं बयाजवार असूनही ती उष्ण सुखद दुपार चढत जाते मला...

दुपारी झाडं मोठी देखणी दिसतात खरी. पण फुलं? ती मात्र उतरत्या दुपारीच भेटावीत. ऐन दुपारी फुलांनी बहरलेल्या एखाद्या वेड्या झाडाला पाहिलं, की त्याच्या सौंदर्याला दाद जाण्याऐवजी त्याची वेड्यासारखी काळजीच वाटते. त्या नाजूक नखर्‍याला सोसवेल का हे लखलखीत धारदार ऊन, असं वाटून डोळे भरून येतात...

याउलट कलत्या दुपारी घराजवळच्या वळणावर ही वेडी फुललेली झाडं नेहमी भेटतात. आणि दर वेळी त्यांना बघून तितकंच मनापासून खूश व्हायला होतं. पानं म्हणशील, तर नाहीतच. नुसतेच गुलाबी पाकळयांचे घोसच्या घोस. रंगही जर्रा म्हणून भडकपणाकडे झुकणारा नव्हे. फिका मऊशार राजस गुलाबी. तुझ्या लाडक्या गावठी गुलाबाची आठवण करून देणारा. ते असं फुलांनी मातलेलं झाड पाहताना आपल्यालाही अगदी वेडं व्हायला होतं.
मनात आपला खुळा गुलमोहोर उभा राहतोच... पण वाटतं, गुलमोहोर एखाद्या भटक्या कलंदर कवीसारखा. त्याच्या केशरी उधळणीत जे बंडखोर उधाण आहे, त्याची सर कशालाच यायची नाही. त्याचे ते लालबुंद तुरे कसे आपल्या नजरेलाही क्षणमात्र का होईना - बंडखोरीची वेडसर स्वप्नं दाखवून जातात. त्या उधाणाला पाहूनच संदीपनं लिहिलं असेल का, 'अस्वस्थ फुलांचे घोस...' असं वाटून जातं...
तसं या गुलाबी नखर्‍याचं नाही. विलक्षण शालीन, शांत-मर्यादशील सौंदर्य नजरही वर न उचलता एखाद्या रेशमी अवगुंठनात उभं असावं तसं याचं रूप. खाली गुलाबी पाकळ्यांचा अक्षरश: सडा. कुणी आपल्याच नादात त्या पाकळ्या तुडवत जातं, तेव्हा त्यातल्या गर्भित श्रीमंतीच्या जाणिवेनं खुळावून जायला होतं...

तसेच ते पिवळ्या फुलांचे घोस.
तशी सोनमोहोराची झाडं आपल्याकडेही असतातच. त्यांच्या हळदी पिवळ्या फुलांचा दिमाख वेगळाच. आधीच उताटल्यासारखी फुलतात ती, आणि त्यात त्यांचा मंद उत्तेजक गंध... पिवळाच असून कॅशिया त्या मानानं किती शालीन. त्याचा सौम्य पिवळसर रंग आणि वार्‍यावर झुलणारे आत्ममग्न घोस.. किती अनाग्रही स्वभाव त्या रंगाचा.
इथल्या पिवळ्या फुलांची जातकुळी या दोघांच्या बरोबर मधली. पातळ नाजूक पाकळ्या आणि तजेलदार सोनपिवळा रंग. अंगातली असेल नसेल तेवढी सगळी ताकद खर्चून मस्ती करणार्‍या वांड पोरासारखी फुललेली फुलंच फुलं. कित्ती बेगुमान स्वभावाची झाली, तरी दिवसभर उन्हाच्या नजरेला बेदरकारपणे नजर देऊन रात्रीला दमत असतील का ही, असं वाटून जातंच.

विलायती शिरिषाचं तसं अप्रूप नव्हेच. एरवी रस्ता पंखाखाली घेतो खरा तो. पण संध्याकाळी त्याच्या मिटलेल्या पानांखालून जाताना उगीच रडायला येईलसं वाटत राहतं. कागदीची गुलबाक्षी रंगाची भरजरी फुलंही आपल्याला तशी सवयीचीच.

माझ्या मुंबईकर नजरेला राहून राहून कौतुकाची वाटतात ती जांभळी किनखापी फुलं. उंचच उंच झाड. फांद्या अगदी संन्यस्त पर्णहीन. आणि त्यावर नाजूक व्हायोलेट रंगाच्या फुलांची पखरण. खाली पाकळ्यांची जांभुळलेली धूळ... त्या निळ्या-जांभळ्या रंगावर विश्वासच बसत नाही एकेकदा. व्यासांच्या त्या निळ्या कमळांचा रंगही असला तर असाच असेल, असं उगाच वाटून जातं...

ऋतू बदलल्यावर काय होईल या सगळ्याचं? बदलत्या ऋतूत निराळी फुलं असतील?

कदाचित फुलं नसतीलही...

खरंच, ऋतू पालटतो, तेव्हा काय होतं?

या उत्सुकतेपोटी तरी जीव रुजावा इथे. कोणास ठाऊक, ऋतू परतेलही...

Sunday 24 February 2008

जगता जगता...

गर्भाशयातल्या अंधाराची स्पष्ट आठवण नाही उरली जगता जगता.

काही पुसट हृदयखुणा फक्त.
काही अनोख्या शांततेचे निरव प्रदेश.
सगळी दु:खं विसरून विसावावं अशा काही अंधार्‍या ऊबदार जागा.
कसल्याही हक्कांविना पोटाशी घेणारे काही कोवळ्या सावलीचे दगडी पार..

अशा प्रदेशांचे पत्ते नसतात कधीच. चालता चालता अवचित सापडून जाणार्‍या या भाग्यखुणा. पावलांना पुन्हा तहान लागलीच, तरी गवसतीलच याची काहीच शाश्वती न देणार्‍या. गूढ. आकर्षक. आश्वासक...

थेटराच्या अंधारात क्वचित सापडून जातो त्यांचा माग. काळोख उतरतो हलक्या मांजर-पावलांनी. पाहता पाहता क्षुद्र कुजबुजी विरत जातात. उत्सुक गाढ शांतता जन्म घेते आसमंतात. या शांततेला मरणाचा गर्द-भीषण वास नाही. जन्माच्या आतुरतेचा एक कोवळा गंध केवळ. उण्यापुर्‍या काही सेकंदांचं आयुष्य या शांततेचं. भारून टाकणार्‍या दमदार आवाजानं मेंदूचा कब्जा घेण्याआधीचं. या अल्पायुष्यामुळेच असेल तिचं गूढ सौंदर्य कदाचित.. आणि पोटाशी धरणारी जिवंत ऊबही.

कधी गाण्याच्या कोवळ्या सुरात सापडतात अशा प्रदेशांच्या वाटा. गाणी एकेकटी येतात थोडीच? गर्द रानात नेणार्‍या आठवणींच्या गूढ वाटांचं जाळं घेऊन येतात गाणी त्यांच्यासोबत. त्या वाटांवर पाऊल ठेवणं-न ठेवणं हातातलं नव्हेच. केवळ पूर्वसंचिताचं खुणावणारं आव्हान. शब्द, सूर आणि मधले अर्थानं भारलेले मौनाचे तुकडे. एकाच वेळी निवांत आणि कासावीसही करण्याची ताकद असणारे. त्यांच्या आव्हानाला सामोरं जायचं ताठ मानेनं. दोन हात करायचे असेल नसेल ती सगळी ताकद एकवटून आणि मग थकून विसावायचं तिथेच... कुणीच हटकायला नाही येणार तिथं, याचं आश्वासन उशाला घेऊन.

तशा कविता जीवघेण्याच. विषारी संवेदनांची शस्त्रं पोटात बाळगणार्‍या. विषकन्यांसारख्याच विश्वासघातकी आणि आकर्षकही. पण त्यांच्यापाशीही कधी कधी मिळून जातो हा मऊ अंधार. एकेका शब्दाचं बोट धरून हलके हलके उतरत जाव्यात एखाद्या खोल अंधार्‍या विहिरीच्या पायर्‍या, तशा अर्थाच्या तळाशी घेऊन जातात कविता कधी कधी. एखाददा पायाखालचा दगड निसटतोही, नाही असं नाही. मग कपाळमोक्ष चुकत नाही. पण हा धोका पत्करून त्या अंधारात पाऊल ठेवावं अशी लालबुंद रसरशीत स्वप्नं असतात कवितांच्या पोटी दडलेली.. क्वचित कधी बोटांना त्याचा निसटता स्पर्श होतो आणि जन्माला पुरेल अशी धगधगती ऊर्जा पाहता पाहता वस्तीला येते आपल्याआत...

एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी माणसंही घेऊन येतात हे असे प्रदेश त्यांच्या पावलांसोबत. पुरेश्या अंतरावरून माणसं न्याहाळण्याची सुरक्षित सवय स्वतःला लावून घेतलेले आपण बिचकतो मग. काहीश्या अविश्वासानं मागे सरतो. अंग आक्रसून घेतो. पण एका जादूभरल्या क्षणी सगळी अविश्वासाची वर्तुळं विरून जातात आणि कुशीत शिरावं कुणाच्या, तसे नि:संकोचपणे नात्यात शिरतो आपण.

तश्या दुर्मीळच या गोष्टी... पण गर्भाशयाच्या पुसट आठवणी जागवणार्‍या... जगता जगता विसरून गेलेल्या त्या विश्वात परतून नेणार्‍या...

Monday 11 February 2008

खरंच...

खरंच...
पावलांखालचे प्रदेश बदलत जातात.
सवयींचे संगही अलगद निसटून जातात.
पाहता पाहता आपल्याच स्वप्नांचे रंग बदलत जातात.

खरंच...
नात्यांमध्ये बदल होत जातात.
पण बदलांना वाढ म्हणावं, सूज म्हणावं,
की धीम्या गतीनं मृतावस्थेकडे होणारा अटळ प्रवास,
हे ठरवण्याची ताकद तर असतेच आपल्यात.

खरंच...
तू ही ताकद वापरण्याची हिंमत केली आहेस कधीतरी?
अमानुष ताकदीच्या प्रश्नांची ही भीषण लाट पेलली आहेस तू कधीतरी?
जगता जगता काय होतं इतक्या उत्कट नात्यांचं,
हा जीव शोषून घेणारा प्रश्न पडला आहे तुला एखाद्या बेशरमपणे ठणकणार्‍या संध्याकाळी?

खरंच...
अजून जाणवतात तुला माझे श्वास त्यांच्या धुंदावणार्‍या लयीसकट?
अजून जाणवतो माझा गंध तुझ्या स्वप्नांच्या अगदी निकट?
अजून चढतो माझा रसरशीत रंग तुझ्या अंगावर त्यातल्या सगळ्या सगळ्या छटांसकट?

नाही.
कसल्याच प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असावीत असा हट्ट नाही आता.
इच्छा असतील... पण त्यांच्याही मर्त्यपणाचा स्वीकार आहे आता.
सवयींचे प्रदेश आणि स्वप्नांची माती पाहता पाहता बदलत जाते आपल्याच नकळत हे कळतं आहे आता.

पण खरंच,
सगळ्या विध्वंसासकट
बदलणार्‍या रंगांसकट
जगताना स्वप्नं अपरिहार्यच -

हे शिकलो आहोत का आपण?
खरंच...

Saturday 9 February 2008

...अफलातूनच!

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

उदाहरणार्थ ऑफीसमध्ये एका भिकार डॉक्युमेण्टमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करून मी प्रचंड दमलेली. आत्ता चहासाठी ब्रेक घेतल्यास किंवा निवांतपणे गूगल टॉक उघडल्यास नवा मॅनेजर आपल्यावर कितपत खूश होईल हा विचार चेहर्‍यावर दिसू न देता साळसूदपणे कामात दंग.

एवढ्यात एक आंग्लाळलेली बया एक म्युझिक सिस्टिम घेऊन अवतीर्ण होते. 'इट्स टाइम टू एक्झरसाइज्' असं म्हणते आणि गर्दीनं भरलेला, मरगळलेला प्लॅटफॉर्म दूरवरची लोकल पाहून जसा एकदम सळसळतो, तसं अवघ्या ऑफीसमधे एकदम चैतन्य सळसळतं.

काही लोक उघडपणे दात काढत बाहेर पडतात.
काही लोक 'आपल्याला देणंघेणं नाय' अशा मख्ख आविर्भावात मॉनिटरमधे घुसतात.
काही लोक सूर्यफूलसदृश तत्परतेनं तिच्याकडे तोंडं वळवतात.
काही लोक शीपिशली हातातली कामं टाकून, खुर्च्या बाजूला सारून जागीच उभे राहतात.

आणि भर ऑफीसमधे दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत ती एरोबिक्सचा वॉर्म अप् सुरू करते.

जेन फोंडा माझी आई असल्याच्या थाटात निर्विकारपणे आणि सराईतपणे एरोबिक्स करताना मला वाह्यात हसायला यायला लागतं.

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडणं एकंदरीत मस्तच.

उदाहरणार्थ एकाच सिग्नलला तीन प्रदक्षिणा घालूनही मला घर सापडतच नाही. पत्ता तोंडपाठ. पण जायचं कसं विचाराल तर आपली बोलती बंद. बरं, मला नाही तर नाही, रिक्षेवाल्याला तरी माहीत असावं? नपेक्षा त्यानं ते कुणाला तरी विचारावं? पण एकतर तो अभिजात मंदबुद्धी तरी असावा किंवा स्वतःच्याच शहरात कुणाला पत्ता विचारण्यानं त्याचा इगो दुखावणार असावा.

परिणामी आम्ही मारतोय आपल्या गरागर चकरा एकाच सिग्नलला.

शेवटी मी बळंच रिक्षा थांबवून त्याला त्याची दक्षिणा देऊन टाकते आणि ट्रॅफिक पोलिसाकडे मोर्चा वळवते. 'कन्नडा बरुन्दिल्ला' हे माझं कन्नडचं ज्ञान, 'व्हेअर गो?' हे पोलिसाचं इंग्लिशचं ज्ञान आणि आजूबाजूच्या तत्पर लोकांचं कामचलाऊ हिंदी यांच्या बळावर माझी वरात स्वगृही पोचते.

आणि पगार ठरवताना कोळणीला लाजवेलशी हुज्जत घालणार्‍या आणि दिवसभर होता होईल तेवढी उद्धट अडवणूक करणार्‍या एचआरवाल्या मॅनेजरचा फोन येतो - डिड यू रीच सेफली? आय वॉज वरिड् यू नो...

मी नीट सुखरूप पोचलेय. आता कॅबचा पिक अप्-ड्रॉप मिळेपर्यंत मी घरी पोचल्यावर एक मिस्ड् कॉल देत जाईन... हे त्याला पटवून देता देता मला परत अनावर हसायला यायला लागतं.

कुठे येऊन कुणासोबत काय चाललंय!

अशीच एक भयानक उदास संध्याकाळ. आपण म्हणजे एक गरीब खाणकामगार असून एकटेच जन्माला आलो आहोत व एकटेच मरणार आहोत, अशा प्रकारचे भीषण विचार डोक्यात चालू. वेळ सरकता सरकतच नसलेला. आपण असेच मरून गेलो तरी कुणाला काही कळणार नाही, असं वाटण्याच्या सुमंगल मुहूर्तावर जुन्या मित्राचा फोन येतो.

माझे बारा वाजलेले त्याला कळू नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न करून मी हसरा आवाज काढण्याच्या प्रयत्नात असतानाच साहेब सेण्टी होतात. 'आता गप्पांचा अड्डा बसत नाही. सगळे एकेकटे आपापला जीव रमवत असतात. मला प्रचंड एकटं वाटतं. तिकडे एखादी नोकरी मिळेल काय..' या त्याच्या एकंदर मूडवर मी उत्तरादाखल भली मोठ्ठी उपदेशाची फैर झाडते.

एकटं असण्याची सवय करून घेतली पाहिजे..
नाही तिथे इमोशनल होऊन कसं चालेल..
सेल्फ पिटी बंद करायला कधी शिकणार..

या वाक्यावर मला इतकं हसायला का येतंय ते बिचार्‍याला कळतच नाही.

काही म्हणा, आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

Friday 11 January 2008

विरासत

तशी पूर्ण कोरी पाटी असूच शकत नाही, हे कबूल. पण तरी दर वेळी ’यांनी आमच्यावर अत्याचार केले, आणि आम्ही षंढासारखे त्यांचं वैभव पाहतो आहोत’ हा चरा वागवायलाच हवा का सोबत?

’आमच्यावर’मधल्या धर्माचा संदर्भ देणार्‍या आणि केव्हाच मरून गेलेल्या लोकांशी नातं जोडणार्‍या या धाग्याबद्दल मी पूर्णपणे उदासीन असल्यामुळेही असेल - आवारातली हरणं आणि मोर वाखाणायला मी मोकळी होते. उलटल्या शतकांतल्या हिंदू-बिंदूंवरच्या अत्याचाराचा माफकसुद्धा सूड काढण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती. पण मग उलट्या टोकाकडून समाजवादी गळेकाढू कौतुकं होऊ नयेत आपल्याकडून, म्हणून सतर्क राहण्याची, स्वखुशीनं पत्करलेली एक जबाबदारी होतीच.
म्हणजे पूर्ण कोरी पाटी नव्हेच.

उतरत्या उन्हाचा सोनेरी रंग, गार वारा आणि चक्क हलकासा पाऊस. बाहेरून काहीच अंदाज येऊ नये इतकं विस्तीर्ण प्रांगण आत शिरल्यावर एकदम सामोरं येणारं. पुन्हा तोच घाट. आता काहीसा परिचित झालेला... आत मात्र त्या वास्तूच्या पोटात उतरणारा काळोखा अरुंद लांबलचक रस्ता. मनावर कसलंसं दडपण आणणारा. आणि मग एक संपूर्ण मोकळी मोठ्ठी खोली. मधोमध एक साधीशी कबर आणि तिथे घुमणारी कुजबुज.

अकबरानं ही कबर त्याच्या जिवंतपणीच बांधायला घेतली होती हा अनोखा तपशील बाहेर पडताना कळला आणि मग त्या साध्या अनलंकृत कबरीचे नि त्यावरच्या दिमाखदार वास्तूचे सगळे संदर्भ उलटे-पालटे झाले. या वेळी कुणीतरी परत ’थडगं तर आहे’ अशी संभावना केल्यावर अकबराच्या वतीनं मी विनाकारण चिडले आणि ’आळंदीला नाही का थडगं ज्ञानेश्वरांचं? की ती तेवढी हिंदूंची असल्यामुळे पवित्र समाधी?’ असा उद्धट खोचक प्रश्नही विचारला.

पण नावं काहीही द्या. समाधी. कबर. किंवा थडगं. व्हॉटेव्हर...

आणि ताजमहाल?

त्या वास्तूचं सगळं सौंदर्य तिनं साधलेल्या तोलात आहे. दोन्ही बाजूंच्या गुलाबी दगडातल्या चिरेबंदी घुमटांनी तोलून धरलेली ती मधली हिर्‍यासारखी नाजूक, नजर लक्कन कापणारी वास्तू. तिच्या मृदू रूपावर नजर ठरत नाही. तसाच तिच्या आसपासचा आदबशीर शांततेचा पैस. तिन्ही दिशांच्या महाद्वारांतून मुख्य द्वारापाशी आणून सोडलेला गतीचा आवेग तिथे जणू अदबीनं रेंगाळतो. आणि मग चुपचाप, हलक्या पावलांनी काळोखात पाय बुडवून हलकेच महालापुढच्या विस्तीर्ण प्रांगणात येतो. इतका वेळ उजेडाचं रोखून धरलेलं भान अचानक जणू उधळून दिल्यासारखं होतं आणि आपण त्या मर्यादशील काळोख्या घुमटाखालून एकदम प्रकाशात उडी घेतो. तिथे खेळवलेलं पाणी, हिरवीचार झाडं, रंगीत फुलं आणि मधल्या विस्तीर्ण प्रांगणात उधळलेली खूप सारी माणसं. हा सगळा उधळलेला आवेग पुन्हा एकवर एकवटतो - फोकस्ड होतो - तो थेट या वास्तूच्या पायांशी जाऊन थांबल्यावर. अनवाणी पावलांनी तिथले काहीसे अंधारे जिने चढून जाताना परत एक दिमाखी शांतता आपल्यावर राज्य करत जाते. इतका वेळ सैलावलेले-उधळलेले-खिदळणारे आपण त्या चार उंच मिनारांच्या, तिथून निराळ्याच दिसणार्‌या भव्य, जरबदार आणि तरीही आपल्याश्या वाटणार्‌या जादुई रूपाकडे पाहताना गप्पगप्पसे होत जातो. पायांखालची किंचित चरबरीत लाल-पांढरी फरशीही आता मऊ सोनसळी स्पर्शाची, मोतिया रंगाची झालेली. संगमरवरात कोरलेली नाजूक जिवंत कमळं आणि एखाद्या गूढ काव्यमय नक्षीसारख्या उर्दूतून कोरलेले आयते.

आत शिरताना आपण निव्वळ शांत-स्तब्ध झालेले. मृदावून गेलेले. कुणाच्याही समाधीपाशी जाताना व्हावी अशी मनाची गंभीर आबदार अवस्था. आणि हे सारं निव्वळ वास्तूच्या परिणामानं साधलेलं. त्या बापड्या मुमताज वा शाहजहानबद्दल काडीचा आपलेपणा वा ओळख नसतानाही.

दी ताज. तेजोमहल. थडगं. व्हॉटेव्हर...

धर्म, राज्यकर्ते, जुलूम-अत्याचार, कल्याणकारी राजवट, प्रीती, विखार...

काय राहतं मागे? कला? स्फूर्तिस्थान? धर्मप्रेमाचं प्रतीक?

की निव्वळ वारसा? सगळं सामावून घेणारा? शरणागत प्रवाही स्वागतशील संस्कृतीचा? तोच तेवढा खरा फक्त बहुधा..