Thursday 6 December 2007

शो मस्ट गो ऑन, यू नो!

कविता. युद्ध. शृंगार. लालभडक मत्सर. रक्तपात-दंगली-खून. चळवळी-क्रांत्या आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणारी कविता. एकाच चिरंतन तत्त्वाचं अव्याहत चक्र जणू...

आपल्या सगळ्यांमधलं हे जे स्पिरिट असतं ना, त्याला संस्कारांनी खूप आकार-उकार देतो आपण. वेळोवेळी काबूत ठेवतो स्वत:चेच सगळे अनावर विकार. तो संयम महत्त्वाचा खराच. पण निरोगी जिवाचं हे तडफडणारं स्पिरिट असतं ना, ते असं शांत नाही बसत. 'माझ्यात काय कमी आहे, म्हणून मी जाऊ देईन ही जगण्याची संधी' असं ज्या त्वेषानं म्हणत असेल एखादा निरोगी, चपळ, सुदृढ, नीती-अनीती न जाणणारा एखादा चित्ता भक्ष्यावर तुटून पडताना; त्याच त्वेषानं जागी होते मनातली ईर्ष्या. नीती-अनीती न जाणताच.

"मला तू हवा आहेस आणि तुलाही मी, मग का मानायचे हे संयमांचे बांध? हा कसला निसर्गाचा अपमान?"

असा रोखठोक प्रश्न यमी यमाला विचारते. ते रक्ताने भाऊ-बहीण असल्यामुळे त्यांना शरीर संबंध शास्त्रानं निषिद्ध सांगितलेला.
हाच प्रश्न विचारते निर्भयपणे लोपामुद्रा अगस्तीला. त्याला संयमानं शरीराची वासना जिंकायची आहे, म्हणून तो तिला शरीरसुख देऊ इच्छित नाही, तो तिचा पती असूनही.
हाच प्रश्न विचारते इंद्राणी इंद्राला. त्याला आता तिच्यात रस नाही उरलेला. एकेकाळी त्यांनी धुंद प्रणय अनुभवलेला असूनही. त्याचं सारं लक्ष जिंकलेलं जग वसवण्यात लागलेलं.
हाच प्रश्न विचारते अंबा भीष्माला. ती स्वत:चं क्रुद्ध तारुण्य घेउन उभी आणि तो मात्र कुरुकुलासाठी सगळ्या कोवळ्या भावना होमून मोकळा झालेला.

पुरुष आणि प्रकृती यांच्यातला हा सनातन वाद. पार वेदकाळापासून चालत आलेला.

आपल्यातला हा वाट्टेल त्या परिस्थितीत जगू पाहणारा लसलसता, फोफावणारा, संस्कृतीला जणू जन्म देणारा कोंब खरा? की संयमाचा-संस्काराचा, संस्कृतीला घडवणारा-आकार देणारा बांध खरा?

कदाचित दोन्हीही. कुणास ठाऊक...

तुला फार आवडणारा कर्ण. त्याचंही तसंच नव्हे का?
तसा कर्ण कुणालाही आवडतोच. कुठल्याही न्यायी, स्वाभिमानी माणसाला आवडावा असाच आहे तो. वाट्याला आलेलं सगळं मुकाट पचवून नशिबालाच मान खाली घालायला लावणारा. अबोलपणे सगळे सगळे मान-अपमान हसत जगून जाणारा.

पण मला कृष्ण जास्त जवळचा वाटत आला आहे नेहमीच.
त्याचं ते सगळं उधळून कुठल्याही गोष्टीत स्वत:ला अर्पून घेणं मोहवतं मला. उतू जाणार्‌य़ा दुधासारखं त्याचं व्यक्तिमत्त्व... अस्सल कलावंतासारखं स्वत:ला जगण्याच्या उल्हासात होमू पाहणारं.. उतू जाणार्‍या दुधासारखं... होमून टाकणारं... किती अर्थपूर्ण शब्द वापरले आहेत दुर्गाबाईंनी... तसाच आहे तो. गोकुळात यशोदेचा आणि राधेचा. मग रुक्मिणी-सत्यभामेचा. मग भीमार्जुनांचा. मग यादवांचा. एकातून दुसरं व्यक्तिमत्त्व जणू उमलत जातं त्याचं. बासरी, रथाचे बंध, तत्त्वज्ञान आणि धनुष्यही. सगळंच कसं उत्कट-संपूर्ण-भरभरून केलेलं. संयम विसरून.

याउलट कर्ण. परिस्थितीनं त्याला धगधगणारा संयमच शिकवला फक्त. सतत स्वत:मधल्या तेजाला आवर घालत जगण्याची मुलखावेगळी सक्ती. जणू सगळा ज्वालामुखी कोंडून धरलेला असावा छातीत असा कोंडून धरलेला अनावर आवेग.

दोन्ही जणू एकाच शक्तीची रूपं. एक उसळणारं. एक बांधलेलं.

हाच का तो बेसिक फरक? द्रविड आणि तेंडुलकरमधला? नसीर आणि अमिताभमधला?

तुझ्या आणि माझ्यामधला?

कोण महत्त्वाचं? कोण बरोबर? कोण खरं?

कदाचित दोन्हीही खरेच. कुणास ठाऊक...

आपण आपापले हट्ट हट्टानं लावून धरायला हवेत मात्र! शो मस्ट गो ऑन, यू नो!

Monday 3 December 2007

I'm just being foolishly absurd!

अशीही काही युद्धे खेळावी लागतात,
ज्यात निर्णायक पावलांनी आणि निर्विकार चेहर्‌यानं
पराभव एखाद्या डोंबासारखा उभा असतो
पुढच्याच टप्प्यावर.
आपण प्रॅक्टिकल शहाणपणा इत्यादी दाखवून
साळसूद माघार घ्यायची आहे की
पाठ फिरवण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेणार्‌या
आपल्याच सूर्याजी पिसाळांची मानवी मजबुरी क्षमाशीलपणे स्वीकारत,
बेमुर्वतपणे रक्तबंबाळ होत
पुढे घुसून ताठ मानेने मरायचे आहे
इतकाच वाव उरतो निवडीला.
युद्ध जिंकणे वा हरणे अशा वेळी अगदीच बिनमहत्त्वाचे झालेले.
डोळ्यांत उतरलेले गरम लालबुंद आवेगी रक्त
आणि डोक्यात उरलेले
'मागे फिरायचे नाही-' इतकेच तुटक वेडसर शब्द.
बाकी सगळे आपल्या जगातले नव्हेच.
अशा वेळी रक्तातला वेडसर मुरारबाजी जिंकतो
की रक्तातच दबा धरून बसलेल्या डार्विनच्या बिलंदर पेशी जिंकतात...
इतकेच पाहायचे खरे तर.
अशा वेळी काय करतात
ते खरे तर मला अजूनही उमगलेले नाही.
जीव वाचवून मुकाट खरीदावेत
शहाण्या रसिकासारखे
पिंजर्‌यातले लव्हबर्डस् इत्यादी
की झाला-न झालेसा
स्वप्नांचा राजवर्खी उदास स्पर्श जपावा
बोटांवरला?
प्रश्न मोठे भाग्याचे...
या असल्या प्रश्नांची उत्तरे देता येणे दूरच राहिले,
असले प्रश्न पाडून घेणेही आचरट आणि आत्मघातकी मानले जाते तुझ्या जगात.
माफ कर मित्रा...
I'm just being foolishly absurd!

Sunday 11 November 2007

एक फिल्म फेस्टिवल उर्फ कथेसारखं काहीतरी

हा कितवा बरं फेस्टिवल तिचा? मारे "आय नीड अ फेस्टिवल. गॉड नोज्‌ आय नीड वन..." असं घोकत होती खरी ती गेला महिनाभर. पण तरी येणारेय का मजा खरोखर, की नुसतीच ’मज्जा येतेय नाही’ची स्वत:शीच केलेली नौटंकी हा बारीकसा किडा तिला बर्‌याचदा चावून गेला होताच. तरी त्याला तस्सं मागे सारत, मारे सुट्टी-बिट्टी घेऊन, घरी फिल्डिंग लावून तिनं आठ दिवस सिनेमे बघायचा घाट घातला होता. "जावं का आजपासून... की आजचा दिवस निवांत झोपावं घरी जाऊन..." हे डोक्यातलं निरुत्साही चक्र बंद करून टाकत ती शुक्रवारी संध्याकाळी परस्पर ऑफिसातूनच थेटरात पोचली, तेव्हा मात्र फेस्टिवलच्या उत्साहाचा वारा नाही म्हणता म्हणता तिला लागलाच.

तसं सगळं काही सालाबादप्रमाणेच तर होतं.

फुकट पासावर हक्कानं आलेले पत्रकार. स्पॉन्सरर्सच्या पासांतून आलेला हाय-प्रोफाईल्‌ एथनिक लवाजमा. घरातल्या कर्त्या बायांनी सगळ्या धबडग्यातून सवड काढून वर्षाकाठी एकदाच एखाद्या लग्नकार्यात भेटावं आणि वर्षाची बेगमी करून घ्यावी तश्श्या नियमितपणे आणि घरगुतीपणे फेस्टिवलमधे भेटणारे साधेसुधे इंटुक रसिक. कॉलेज बंक करून आलेली उसळत्या उत्साहातली कारटी. कुणाचं लक्ष आपल्याकडे जातंय का याकडे एक डोळा ठेवून असलेली आणि मग कुणी ओळखीचं स्मित केलंच तर जेमतेम हसल्यासारखं करणारी सेलिब्रिटी स्टेटसच्या काठावरची काही व्यक्तिमत्त्वं. अभ्यासूपणे सिनेमे पाहणारे तंत्रज्ञ. तावातावानं चर्चा-बिर्चा करणारे समीक्षक. लगबगीत असणारे छापपाडू आयोजक. आणि आश्चर्यकारक सहनशीलता नि कार्यक्षमता दाखवत या सगळ्या ’अशक्य’ जमावाला हाकणारे कार्यकर्ते.

सगळं तसंच.

तरी त्यातल्या तोचतोचपणावर तिचा सध्याचा खास ट्रेडमार्क असलेली चिडचिड न करता हवेतल्या उल्हासाला प्रतिसाद देत ती जरा मनाविरुद्धच खुशाललीय, हे तिचं तिला जाणवलं, तोवर ओपनिंग फिल्म सुरूही झाली होती. मग फेस्टिवलनं ताबा घेतला तिचा...

***
हा फेस्टिवलचा माहौल आणि त्यातली ’ती’. मीच आहे की ही... मला प्रचंड आश्चर्य वाटतं. शिवाय कथेसारखं काहीतरी लिहितेय की काय मी, असंही एक अंगावर पाल पडल्यासारखं पोट-आश्चर्य वाटून जातं. ही बया आली कुठून? आणि माझ्या घरचं थोडं झालेलं असताना, मी हे व्याह्यांचं घोडं का नाचवायचं? घरी जा... मला काहीही पडलेली नाहीय असं तिरसट उत्तर तोंडावर येतं. पण मग एकदम वाटतं, हे जर कथेसारखं काहीतरी असेल, तर ’ती’ माझ्यापेक्षा वेगळी असणार. तिचे प्रश्नही वेगळे आणि कदाचित उत्तरंही. शिवाय तिच्या आयुष्यात काहीतरी घडतंय, हे काय कमी महत्त्वाचं आहे? कथा आहे, तर सुरुवात-मध्य-शेवट असं काहीतरी असेल आणि कदाचित निष्कर्षवजा उत्तरंही असतील. "माझी" नव्हेत, पण माझ्यासारखीच. तिच्या उत्तरांबद्दलची उत्सुकता मला एकाच वेळी एकदम उतावीळ आणि सहनशील करून टाकते...

***
तशी मजा-बिजा यायला एकदम आदर्श परिस्थिती. सकाळी उठून बाहेर पडायचं तेच मुळी ’आज कुणाचे बरं सिनेमे पाहू या’ असा गोड प्रश्न मनाशी घेऊन. अर्थात सगळेच क्लासिक्स पाहायला मिळतील हा गैरसमज नव्हता उरला तिच्याजवळ इतक्या फेस्टिवल्सच्या अनुभवानंतर. हेही तसं नव्या मैत्र्या सुरू करण्यासारखंच, हे जाणून होती ती. सुरुवात करताना पुरेश्या उत्साहात आणि शक्य तेवढ्या निर्मळ मनानं करायची. मग आपण किती दुखावतो, किती सुखावतो, काय कमावतो आणि काय गमावतो हे सगळं आपण स्वत: सोडून इतर बर्‌याचशा अनकण्ट्रोलेबल घटकांवर अवलंबून. त्यातल्या त्यात तपासून पाहता येण्यासारखं तेवढं पाहायचं - उदाहरणार्थ शक्यतोवर नवा इंडियन सिनेमा नको. तो हमखास क्रॉसओव्हर विषयावरचा तथाकथित विनोदी वगैरे तरी असणार, नाहीतर मग ’विश्वीकरणाच्या झंझावातात भारतीय मूल्यं जपायला हवीत’ असा गळे काढणारा तरी असणार. अपवाद असतातच म्हणा. पण ठोकताळे केव्हाही सुरक्षित.

’पडेल ती किंमत मोजून बेहोश निरोगी मजा की धोपटमार्गानं जाऊन सुरक्षितता-स्थैर्य’ या वादात कायम मित्राशी भांडणार्‌या आपणही जगता जगता बदललो की काय, या विचारानं ती कळवळली आणि मग इतके दिवस न दिसलेली नवीच मजबूरी समजून आल्यासारखी झाली तिला. मित्राची असं नव्हे, एकंदरीतच माणसाची. नेहमी मित्र आठवल्यावर स्वत:चाच राग येऊन होणारा तिचा चरफडाट या वेळी झाला नाही, तेव्हा ती चक्क गडबडलीच. आनंदाचा वा सुखाचा आधार होतो माणसाला असं नाही, कधी कधी माणसं स्वत:च्या सतत चरफडण्याच्या-चिडचिडण्याच्या सवयीचाही आधार करून घेतात. तसंच झालंय बहुधा आपल्याला हा एक नवाच साक्षात्कार झाला तिला.

त्या आश्चर्या-आनंदात मग ती चक्क एक कानडी सिनेमा पाहायला थेटरात शिरली. अपेक्षेप्रमाणे तो पुरेसा बटबटीत आणि साचेबंद निघत गेलाही! शिवाय त्यातली नर्स अगदी आदर्श अनाथ बाईनं असायला हवं, तश्शी सोज्ज्वळ-सडी-सुसंस्कृत-सेवाभावी-सुस्वरूप आणि शिवाय कलकत्ता साड्या नेसून वर कुंकूही लावणारी होती. तिला आणि तिची सेवा घेऊन तिला मुलीसारखं वगैरे मानणार्‌या त्या बाबाला पाहताना परत एक सूक्ष्म राग साचत गेला तिच्याआत. त्या बाबासाठी स्वार्थत्याग करून, वर त्याच्या पाया-बिया पडून ती क्षितिजाकडे निघून गेली तेव्हा तर उपरोधिक तोंडं करून तिनं मैत्रिणीला पार वैताग आणला.

"कुणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा निर्णय नाही का? तिच्या सोज्ज्वळ चाकोरीबद्ध वागण्याबद्दल तू चिडचिड करून काय होणारेय कुणास ठाऊक..." या मैत्रिणीच्या शेर्‌यावर मात्र परत एकदा थांबून विचार करणं भाग पडलं तिला. आणि मग ’आजच दिवस साक्षात्काराचाच’ हे मनोमन मान्य करत तिनं थेटरासमोरच्या टपरीकडे मोर्चा वळवला...

***
एवढी चिडचिड का करत असेल ’ती’, मला मनापासून प्रश्न पडतो. आपल्यासारखाच तिचाही सो-कॉल्ड प्रेमभंग वगैरे झाला असेल? पण अशी चिडचिड करून काय होणार? जी आदर्श संभाव्य उत्तरं आहेत ती शोधलीच आहेत की नाही बाई आपण? मग आता किती टाचा घासून रडलं म्हणून काय बरं होणार? नुसतंच स्वत:चं आयुष्य थांबवून धरल्याचं पाप की नाही? असे अनेक प्रश्न एकदम घाईघाईत मला पडून जातात. या कथेत तिला हे प्रश्न स्वत:लाच पडल्याचं दाखवून तिची चांगली पंचाईत करण्याचा एक माफक दुष्ट विचारही येऊन जातो मनात.

पण मग एकदम वाटतं, ’ती’ माझ्यासारखीच असं मीच म्हटलं होतं... पण म्हणजे मीही नुसतंच आयुष्य थांबवून धरलंय....? तिला निदान त्याचा साक्षात्कार तरी झालाय... माझं काय?

समाधानकारक स्पष्टीकरणं आणि समर्थनं देता येत नाहीत तेव्हा मात्र माझा नाईलाज होतो. माझीच कथा आणि वर मलाच कोंडीत पकडणार? हॅट! कथेसारखं काहीतरी लिहिण्याचं पाप करतेच आहे मी, तर मग मला थोडा तरी फायदा मिळायला नको का?! मग मी सरळ फेस्टिवलमधल्या इतर काही इंटरेस्टिंग गोष्टींकडे लक्ष वेधून घेतल्यासारखं करून पळ काढायचं ठरवते...

***
काही अर्थपूर्ण-एक्सायटिंग आणि काही कंटाळवाणेही सिनेमे, त्यावरच्या निरर्थक चर्चा आणि क्वचित प्रसंगी होणारे असले साक्षात्कार सोडले तर इतरही बर्‌याच गोष्टी फेस्टिवलमधे असतात. सिनेमा बुडवून बाहेर कट्ट्यावर बसून करायची भंकस ही त्यातली एक प्रमुख आकर्षक गोष्ट. सगळं काही आतल्या आत कोंडून टाकून वर निर्विकार राहण्याच्या तिच्या सध्याच्या प्रयत्नांना तर विशेष सूट होणारी. दिवसाच्या - वा रात्रीच्याही - कुठल्याही प्रहरी कटिंग मागवून, गॉसिप्स करून, क्वचित एखाद्याच समजूतदार वाक्यातून सगळ्या फ्रस्टेशन्सवर फुंकर घालून दोस्ती देऊ करणारी ही भंकस. यंदाच्या फेस्टिवलमधी तिनं ती मनापासून एन्जॉय केली.

झालंच तर एकमेकांना टाळू पाहणार्‌या दोन माणसांना एकमेकांवर सोडून, आपण समोर दात काढत उभं राहण्यातली गंमत. आपल्याला फारसं सोईचं नसलेलं कुणी आपल्याला भेटलंच, तर आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून वेळ निभावून नेणं... महारटाळ पत्रकार परिषदांमधे काईच्या काईच अचाट आचरट प्रश्न विचारून मग सरळ गायब होणं... ओपनिंग आणि क्लोजिंग सेरिमनीत व्यासपीठावर चालणारा अभूतपूर्व विनोदी गोंधळ...

आणि खेरीज काही अंतर्मुख वगैरे करणारे सिनेमेही.

नाही म्हणता म्हणता खरंच मजा येत गेली की तिला. इतकी, की निव्वळ स्वत:ची कीव करून एक सिनेमा घळघळा रडत पाहणारी ती, बाहेर पडल्यावर स्वत:लाच चक्रम आणि हट्टी म्हणण्याइतकी निवळली. एका डेन्जरस पकाऊ समीक्षिकेला टाळण्यासाठी चार पत्रकारांनी जिवाच्या आकांतानं केलेली पळापळ पाहून खुदकन हसा-बिसायलाही आलं तिला.

जुन्या मित्र-मैत्रिणींच्या कोंडाळ्यात ५-६ दिवस असे खतरनाक वेगात संपले आणि दुसर्‌या दिवशी ऑफिसला जायचंय, हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती एकदम गळपटलीच. सगळे साक्षात्कार आणि लाईफ-बिईफबद्दलचे समंजस फण्डे जमेस धरूनही तिला धैर्य काही गोळा करता येईना. परत एकदा तेच सगळं. तेच चेहरे, तीच टाळाटाळ, तोच रोज उठून नव्यानं होणारा मनस्ताप. काय करावं काही सुचेचना. त्याच तिरीमिरीत "मला भूक लागलीय, चल काहीतरी खाऊ या" असा वैताग निर्वाणीचा सूर लावत तिनं मैत्रिणीला कटकट केली, तेव्हा तिला परत एकदा मित्राचे ठाम शब्द आठवले - काही भूक-बिक लागली नाहीय तुला. डोकं फिरलं की भूक लागलीय हे एक सोप्पं उत्तर फेकून मोकळी होतेस तू, हे तुझ्या लक्षात आलंय का?

यावर मात्र न भूतो न भविष्यति असा तिळपापड झाला तिच्या अंगाचा आणि ती ऑलमोस्ट हिस्टेरिकली ओरडली मैत्रिणीवर - "दुसरं-तिसरं काही नाही, मला भूकच लागलीय." "पण मी कुठे काय म्हणतेय, जाऊ या ना..." असं डिफेन्सिव्हली पुटपुटणार्‌या मैत्रिणीला कळलंच नाही तिच्या उद्रेकाचं कारण.

या टोटल फिल्मी अनावर आठवणी-बिठवणींतून कसं बाहेर पडायचं ते न कळून ती पार हताश झाली...

***
असं काही आपण तर नाही बुवा केलेलं... मी नीट आठवून म्हणते स्वत:शीच. ’काय तरी एकेक चमत्कारिक माणसं.. नाही जमली एखादी गोष्ट मनासारखी. ठीकाय.. इतका मनस्ताप कशाला करून घ्यावा..’ असली भोचक प्रतिक्रिया माझ्याही डोक्यात सहजच जाते उमटून.

पण खरा वाईट भाग हा, की हे सगळं तिथेच थांबत नाही. आपण असं काही केलेलं नाही हे खरंच. पण असं काही करू शकलो असतो नक्कीच, हे विसरता येत नाही. "मनस्तापाच्या आणि समजूतदारपणाच्या गोष्टी कुणाला सांगता? माझ्यातला असला-नसलेला सगळा जीव उधळून केलाय मी हा जिवावरचा उत्कट मूर्खपणा. इतक्या सहज सोडून द्यायला काय लिपस्टिकची शेड आहे ती चार दुकानांत न मिळणारी? व्हाय डोण्ट यू पीपल अंडरस्टॅण्ड, इट्स नॉट अबाउट एनीबडी एल्स बट माय ओन इण्टेन्सिटी...." हा माझाच व्याकुळ संताप परत एकदा जिवंत होऊन उभा राहतो माझ्यासमोर.

मग मात्र मी थोबाडात मारल्यागत गप होऊन जाते... ’तिची’ गोष्ट शेवटापर्यंत न्यायला हवी.. त्यातूनच मिळतील कदाचित काही उत्तरं.. काही नवे रस्ते, याही खात्री पटायला लागलेली मला हळूहळू...

***
हजार समजावणीच्या क्षणांनी आणि निर्धारी, स्वाभिनामी संकल्पांनी न दिलेला तो क्षण प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात आला तो अगदी अनपेक्षित साधेपणानं.

कुठलीही परिपूर्ण कलाकृती एक उदास संपूर्ण आनंद देऊ करते अनुभवणार्‌याला. सगळं काही उमगलेलं, त्यामागची अपरिहार्यता कळून चुकलेली, तरीही ’गमते उदास’ हे आहेच आणि विचारशक्तीला-संवेदनेला मात्र एखाद्या दुधारी शस्त्रासारखी लखलखती धार चढलेली.

एका औटघटकेच्या पण उत्कट नात्यावरचा सिनेमा होता तो. जेमतेम काही तासांचं आयुष्य लाभलेल्या, पण त्या दोघांच्या मनात चिरंतन होऊन राहिलेल्या नात्याची ती गोष्ट. ती पाहून कितीतरी वेळ उलटून गेला तरी तिनं दिलेलं ताजेपण तस्सं शिल्लक होतं तिच्याआत. तिचा मित्रही तर तस्सा ताजा शिल्लक होता तिच्याआत. तिच्या संतापालाही न पुसता आलेले त्याचे ठसे तस्से उमटून होते तिच्या मातीत...

आता त्या नात्याला जिवंत भविष्य नाही, हे मान्य करता करताच त्या नात्यानं दिलेली श्रीमंतीही लख्ख दिसून आली तिला. ऐन प्रेमाच्या दिवसांत केलेल्या एका रोमॅण्टिक कवितेचे शब्द नव्यानंच आठवले -

तुला पत्र लिहिलं होतं,
तेव्हाही चंद्र असाच खिडकीबाहेर थांबून राहिलेला.
आजही तसाच.
चंद्रसाहेब दिसत राहणार,
चंद्रसाहेब असत राहणार.
पण इथल्या दगडी फरसबंदीवर उमटलेले तुझ्या पावलांचे ठसे,
अवेळच्या पावसाचं त्यांत साठून राहिलेलं हे पाणी,
आणि त्यात सांडलेले हे चंद्राचे काही लखलखते तुकडे.
दर पावसात,
दर पौर्णिमेला...
चंद्रसाहेब दिसत राहणार,
चंद्रसाहेब असत राहणार.
जगातल्या सगळ्या तुटल्या- न तुटलेल्या, अनेकार्थांनी श्रीमंत करून जाणार्‌या नात्यांचे चंद्र असेच असत असणार आहेत... हे मनोमन स्वीकारून टाकलं तिनं.
तिचा यंदाचा फेस्टिवल ’सुफळ संपूर्ण’ झाला...

Tuesday 6 November 2007

रायटर्स ब्लॉक


बिनओळींच्या कागदावर लिहिण्यातली गंमत काही औरच.


कोरा करकरीत कागद आणि आपण. अधेमधे साधा ओळींचाही आसरा नाही. आपण संपूर्ण निराधार. समोर काहीतरी अफाट सुंदर अंतहीन पसरलेलं असावं अशी मन दडपून टाकणारी, पाऽऽर एकटं वाटायला लावणारी भावना. ’सर्वांगानं भिडावं - काय होईल ते होईल’ अशी उद्धट ओढ आणि ’आपण नेहमीसारखी माती खाणार...’ अशी नर्व्हस करून टाकणारी बर्फगार भीतीही...


कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद.


ती गंमत रेखीव कागदात नाही. आई-बापांनी आखून दिलेल्या रस्त्यावर निमूटपणे चालून नीट शहाण्यासारखं यशस्वी-बिशस्वीही व्हावं तसं वाटतं ओळी आखलेल्या कागदावर लिहिताना...


कधी कधी एखाद्या भाग्यवान क्षणी मनासारखं पांढर्‌यावर काळं होतंही. अशा वेळी मला हटकून ’रंगीला’मधल्या त्या वल्ली दिग्दर्शकाची आठवण येते. "अपनी कॉम्पिटिशन यहाँके डिरेक्टर्ससे हैंही नही..." असं म्हणणारा, पैसे वाचवण्यासाठी निर्मात्यानं बसच्या ऐवजी रिक्षा देऊ केल्यावर भन्नाट उखडणारा तो दिग्दर्शक खरा तर त्या कथानकात कुठेच महत्त्वाचा नव्हे. पण त्याचं ते मनस्वी आर्टिस्टपण दोन-चार फटकार्‌यातूनही नीट लक्षात राहून जातं. सिनेमातला सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांनी केलेला पसंतीचा जल्लोष म्हणजे आपल्या हक्काची दाद आहे, अशा थाटात स्वत:वरच खूश झालेली त्याची ती मुद्रा... ’मोहम्मद बिन तुघलक’ हेच एक नाव त्याला शोभेल! वाटेवरल्या धोक्यांची आणि त्यात पणाला लागलेल्या सर्स्वस्वाची लख्ख जाणीव, ते सारं पार करून येताना आलेला आत्मविश्वास आणि कलाकाराच्याच मुद्रेवर उमटू शकेल अशी लोभस धन्यता...


एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी तो दिग्दर्शक होऊन जाण्याइतके नशीबवान ठरतोही आपण. नाही असं नाही. पण असे क्षण दुर्मीळच... एरवी संवेद म्हणतो तशी " आणि शब्द सापडलेच नाही तर? अर्थांचे कोलाज परत मागाल मला सारे?" अशी अवस्था.


आत्ममग्न समाधानाचे क्षण विलक्षण दुर्लभ आणि तसेच क्षणभंगुरही. तेवढ्या औटघटकेच्या श्रीमंत सोनेरी स्पॉटलाईटमधून बाहेर पडल्यावर सगळेच सामान्य ब्लॅकाउट्स. सगळी आभासी जादू हिरावून घेणारे. "शी:, हे लिहिलं आपण?" असा स्वत:चाच अविश्वासयुक्त राग आणि प्रामाणिक शरम. "बास झाला आचरटपणा" असा घोर, प्रामाणिक निश्चय ही अशा वेळा साधून येणारी नियमित बाब.


तरीही बेशरमपणे परत एकदा पांढर्‌य़ावर काळे करण्याची वेळ येतेच. तेव्हा आपल्याच बेशरमपणाचा, लोचटपणाचा, नाईलाजाचा जो बेक्क्कार तिटकारा वाटतो, त्याची तुलना कशाशीच होणार नाही.


आतलं सगळं बेगुमानपणे बाहेर उधळून टाकण्याची तीव्र गरज आणि "पुरे झाला फजिता..." असा ठाम कठोर आवाज स्वत:चाच. दोन्ही एकाच वेळी.


यालाही ’रायटर्स ब्लॉक’ म्हणतात? कुणास ठाउक...

Wednesday 31 October 2007

शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...

सांस्कृतिक कार्यक्रम तसे गावाला नवे नव्हेतच. गाणं, नाटक, चर्चा-बिर्चा, मुलाखती, व्याख्यानं... सगळ्यात तशी वरघटून गेलेली मी. पण परवाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाताना मात्र बर्‌याच दिवसांनी जुन्या घरी परतल्याचा ’फील’ यावा, तसं झालं. प्रत्यक्षात अप्रूप-कौतुक किती होतं मला कार्यक्रमाचं कुणास ठाऊक.. ’फॉर ओल्ड टाईम्स सेक...’ प्रकारच्या हुरहुरत्या-निसटत्या आनंदाचाच भाग जास्त असल्यासारखा...

नाटकाच्या जादूनं इतकं भारल्यासारखं व्हायचं, की साधं ग्रीन-रूममधे शिरतानाही बेक्कार धडधडायचं छातीत. त्याला कितीसे दिवस झाले? ए. सी., पर्फ्यूम्स, मेक-अप आणि चहा यांचा तो विलक्षण उत्तेजक गंध. आनंद, एक्साईटमेंट आणि एक विचित्र दडपण यांनी वाढलेले छातीचे ठोके. तिथल्या मंद-सोनेरी प्रकाशातला, धीरगंभीरपणे मेक-अप उतरवणारा वीरेन्द्र प्रधान आणि त्याचा शांत आत्ममग्न चेहरा. इतका लख्ख कोरला गेला आहे तो डोक्यात, की अजुनी ’स्ट्र’ला त्याचाच चेहरा दिला जातो आपसूक...

प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या बापाची जहागीर असल्याच्या थाटात उत्सुक चाहत्यांवर डाफरणारे मंडळाचे दीडशहाणे कार्यकर्ते आणि त्यांना शहाजोगपणे बाजूला सारून, चुपचाप आत घुसून आशुतोष गोवारीकरला गाठणारी मी. त्याच्या रोखठोक प्रामाणिक मुलाखतीचे रंग डोक्यात पुरते ताजे. त्याच्या किंचित मिश्कील, प्रश्नार्थक मुद्रेला तसंच हसर्‌या नजरेचं उत्तर देत त्याला विचारलं होतं, द्याल का सही? ’हात्तेरेकी!’ असं म्हणून त्यानं झोकात सही करून दिली तेव्हा त्याच्यावरही क्षणभर विश्वासच नव्हता बसला...

तसाच मारे जागा धरून ठेवायला म्हणून घाईघाईत गाठलेला सेवासंघातला सानेकरांच्या गज़लांचा कार्यक्रम आणि जेमतेम साडेतीन प्रेक्षकांनी ’भरलेला’ तो भला मोठा हॉल. आयोजक, माझ्यासारखे कुणी तीन-साडेतीन अतिहौशी रसिक आणि चक्क वाती वळायला येऊन बसलेल्या एक ’ए’कारान्त आजीबाई. आयोजकांच्या वतीनं मलाच मनापसून शरमल्यासारखं झालेलं. आणि तरी आश्चर्यकारक चढत्या गतीनं रंगत गेलेला तो कार्यक्रम. त्यातल्या ’तुझ्या डोळ्यांमधे गहिर्‌या, असा मी हिंडतो आहे’नं किती काळ साथ पुरवलीय...

शनिवारची रिकामी संध्याकाळ बळेच भरून टाकायला ’मॅजेस्टिक’मधे टाकलेली चक्कर आणि काउंटरपाशी गप्पा मारणारे चक्क आख्खे जिवंत खरे-खुरे सामंत. त्यांच्या हातात त्यांचंच कोरं पुस्तक कोंबत त्यांची सही मागितली, तेव्हा ’अरेच्चा, मला ओळखता की काय’ असं काहीसं पुटपुटत त्यांनी नाव विचारलं. आणि ते सांगितल्यावर ’वा, वा... पेठे व्हा’ असं म्हणाले. त्या सगळ्या अनपेक्षितपणाच्या आनंदात मित्राशी झालेलं एक मोठ्ठं भांडण आपणहून मिटवून टाकलेलं आणि ती उदास रिकामी संध्याकाळ पाहता पाहता रंगीत-झगमगती होऊन गेलेली...

’ग्रहणम्‌’ नावाचा एक अप्रतिम सुरेख सिनेमा फेस्टिवलमधे पाहिलेला. बाईच्या आयुष्याचे सगळे चढ-उतार आणि त्याबद्दलची तिची सोशीक सखोल समजूत... हे सगळं टिपलं होतं त्यानं त्या लहानश्या कथानकात. तेही काळ्या-पांधर्‌या रंगांत. त्याचं जाडेभरडेपण अधोरेखित करून दाखवायला म्हणून त्यानं अखेरीस वापरलेल्या काही लख्ख रंगीत, उजळ फ्रेम्स... काय माध्यमावरची पकड म्हणावी ही, अशा कौतुकात थेटराबाहेर पडत असतानाच समोर उभा राहून हसतमुखानं अभिनंदनं स्वीकारणारा दिग्दर्शक. अगदी आपल्या वयाचाच असावा इतका पोरगेलासा ताजा-हसरा चेहरा. परवा-परवापर्यंत त्याचं कार्ड जपून ठेवलं होतं नकळत...

आभारप्रदर्शन ऐकून उगाच रसभंग होईल याची प्रामाणिक भीती आणि म्हणून उद्धटपणाचा आरोप पत्करून मेघना पेठेची मुलाखत ऐकून घाईघईत काढलेला पळ. तेव्हा खुद्द तिची सही घ्यायला जायचीही भीतीच वाटली होती, इतका अनाघ्रात ताजा अनुभव रक्तात साठवलेला. मग तो सगळा अनुभव कागदावर ओतेपर्यंत कुणाशी बोलायलाही जमलं नव्हतं धड...

आणि तरीही...

परवा सौमित्रची मुलाखत ऐकायला जाताना मलाच माझा उत्साह लटका वाटणारा. तिथे जाऊनही मी ’हॅट, मराठी पुस्तकांच्या दुकानाचा वर्धापनदिन आणि जमलेली सगळी टाळकी पेन्शनीत निघालेली, मरणार वाटतं खरंच भाषा माझी..’ असल्या व्यर्थ चिंतेत चूर. सौमित्र आणि प्रभावळकर अशी स्टार दुक्कल समोर असूनही मी मुलाखतकार बाईंच्या शाळा-मास्तरू प्रश्नांवर उखडलेली. सौमित्रनं सादर केलेली कविताही चक्क ’बिलंदर सराईत परफॉर्मन्स’ वाटला मला...

घरी परतताना ’वा, मजा आली’ असं म्हणायचं असल्यास, तशी मुभा होतीच. पण का कुणास ठाऊक, असं म्हणायला जीभ रेटेना... एक्साईट होण्याच्या स्वत:च्या संपून गेलेल्या क्षमतांवर, उलटणार्‌या दिवसांसोबत स्वत:त येत गेलेल्या निबरपणावर चरफडावं; की ’आता असे उठल्या-सुटल्या कशानंही भारावून नाही जात आपण... शहाणे-बिहाणे झालो की चक्क’ अशी स्वत:चीच पाठ थोपटावी ते कळेचना...

संदीपचे शब्द आठवले परत एकदा (!) - ’शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...’

तसंच की काय हे?

वाढत्या वयासोबत येत गेलेली ही ’सो कॉल्ड’ मॅच्युरिटी की नुसतंच मद्दड कातडीचं निबरपण...

की एकाच नाण्याच्या दोन अपरिहार्य बाजू?

Monday 29 October 2007

तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा


'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.


तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

आणि आता,
थेट 'शोले'मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

प्रदेश उजाड खरेच...
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.

'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

Monday 22 October 2007

दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून - वाचनालयांतून - घरोघरी - देशी - परदेशी - रद्दीवाल्याकडे - तिथून पुन्हा एखाद्या हौशी वाचकाकडे... रिसायकल होत राहतात. दुसर्‌या कुठल्या भाषेत या अशा वार्षिकांची परंपरा नाही. अनियतकालिकांची चळवळ क्षीण होऊन गेल्यानंतरही हे सो-कॉल्ड स्वस्त साहित्य अजूनही जीव धरून आहे. त्या त्या काळातल्या महत्त्वाच्या साहित्य प्रवाहांचं प्रतिबिंब अजूनही लख्खपणे दाखवतं आहे.

’खरं साहित्य कुठे फळतंय ते त्या ’yz’ ना माहीतच नाहीये’ हे संवेदचं वाक्य खरंच. कारण एरवी साहित्यातल्या अनेक प्रवाहांचं प्रतिबिंब दाखवणार्‌या दिवाळी अंकांनीही ब्लॉगविश्वाची दखल घेतलेली नाहीच! आता निव्वळ ’आठवणींचे कढ’ किंवा ’स्वरचित कविता छापण्याची हौस’ या प्राथमिक अवस्थांतून ब्लॉगविश्व काहीसं बाहेर पडत असलं तरीही.

तरीही... तरीही त्यांचं मोल कमी होत नाही. वर्षानुवर्षं दर्जा टिकवून असणार्‌या - चाकोरीबाहेरचे दमदार विषय देणार्‌या ’अक्षर’पासून खानदानी बैठक सांभाळून असणार्‌या ’मौजे’पर्यंत... धूमकेतूसारख्या लख्ख चमकून लुप्त झालेल्या ’चार्वाक’पासून संपादिकेचा आगळावेगळा ठसा घेऊन येणार्‌या ’शब्द’पर्यंत... काहीश्या बोजड म्हणता येतील अश्या चर्चांनी विद्वत्त्जड-भारदस्त वाटणारे ’सत्याग्रही’-’युगांतर’ आणि टिपिकल पुणेरी बाजाचा पण, काटेकोरपणे दर्जा आणि वेगळेपण सांभाळून असणारा ’साप्ताहिक सकाळ’...

किती नावं घेतली तरी काही ना काही सुटून जाणारच...

या निमित्तानं तुम्हीही लिहा दिवाळी अंकांवर. टॅग करणं तसं निमित्तमात्रच. मी या मंडळींना टॅग करतेय.. पण ’खो’ तुमच्यापर्यंत पोचण्याआधीही तुम्ही लिहू शकताच!

नंदन
अभिजीत कुलकर्णी

ट्युलिप

Saturday 20 October 2007

गणपती बाप्पा मोरया!

गणपती आणि इन जनरलच देव-धर्म-संस्कृती-सण-समारंभ-सोहळे यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यामुळे कुणाच्या भावना दुखावणार वगैरे असतील तर पुढे वाचू नका. हा मजकूर तुमच्यासाठी नाही.

मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून पाहिलाय, की आपल्यालाही चार लोकांसारखं गणपती आल्यानंतर उत्साही वगैरे वाटावं. पण तसं होत नाही. आधीच पावसाची नवलाई संपून ’पुरे आता, टळा’ या प्रकारचा मूड झालेला असतो. रिपरिपणारा पाऊस, खड्डे, चिखल, रस्त्यावरून तुंबलेलं पाणी आणि त्यात तरंगणारा कचरा... आणि मग शिवाय गणपती.

गणपती, त्याचा लडिवाळ आकार, त्याचं बुद्धीची देवता वगैरे असणं आणि संस्कृती-बिंस्कृती सगळं ठीक आहे, पण आता मला नाही त्यात फारशी मजा वाटत, तर कुणाची काही हरकत आहे का? पण नाही. एकदा गणपती हा शब्द उच्चारला की तुमच्या भावना कश्या उचंबळून इत्यादी आल्याच पाहिजेत. नाहीतर तुम्ही उद्धट. बरं, तेवढ्यावर भागत नाही. आपण ज्यांना वर्षाकाठी फक्त एकदाच पाहतो अशा नातेवाईक कम परिचितांकडे जा, त्यांच्या थर्माकोलच्या भीषण सजावटी पहा, तळलेल्या पोह्यांचा (किंवा मक्याचा) भयानक गोड चिवडा आणि ते पिठूळ लागणारे, त्रिकोणी खोक्यातून येणारे (यात काय मस्णी गोम आहे कुणास ठाऊक), ’काजू मोदक’ नावाचा अपमान करणारे गोळे खा आणि कोरे कपडे चिखलापासून सांभाळायची कसरत करत दिवसाकाठी साधारण तेरा-साडेतेरा घरं घ्या. काय डोंबलाची गंमत?

हां, आता कुणाला बोंबलायची हौस फिटवून घ्यायची असेल, तरी मी समजू शकते. पण मला तीही हौस नाही. मॅडसारखं देवाच्या पुढ्यात उभं राहून ’येई हो विठ्ठले...’ किंवा ’गरुडावर बैसोऽऽऽऽऽऽऽऽनी’ ओरडण्यात नाही बुवा मज्जा वाटत. ते नाही तर नाही, ब्राह्मणी पद्धतीत शांतपणे अथर्वशीर्षाची आवर्तनंही करून पाहिलियेत मी. पण ह्यॅ:! पार मूर्खासारखं वाटतं. एकच एक स्तोत्र आपलं परत परत परत परत म्हणायचं. काय अर्थ?

मोदक या कम्पल्सरी लोकप्रिय पक्वान्नाचंही मला प्रेम नाही. एखादा बरा लागतो गरम असेल (उकड लुसलुशीत शिजली असेल, सारण खमंग असेल आणि तूप रवाळ-ताजं असेल) तर. पण तेवढ्यासाठी तो गणपती आणि आरत्या नावाचा तासंतास ताटकळवणारा प्रकार आणि बेक्कार ध्वनिप्रदूषण सोसायचं? एवढे काही छान नाही लागत मोदक.

भरीत भर म्हणून तो टिळकांनी माथी मारून ठेवलेला सार्वजनिक गणपती नावाचा प्रकार. कसली जागृती आणि आणि कसलं काय! ’ओ’ येईस्तोवर केलेल्या त्या फिरत्या लाइटिंगमधे सौंदर्य असतं, की त्या निर्बुद्ध हलत्या पुतळ्यांच्यात? की तिथे केलेल्या दारूबंदी इत्यादी देखाव्यात?

यात विरुद्ध बाजूनं बोलण्यासारखेही बरेच मुद्दे आहेत. सार्वजनिक उन्मादाला वाट काढून देण्याची गरज, सांस्कृतिक भूक भागवण्याची सोय, विचार न करता माथा झुकवण्यामधली सोईस्कर मानसिक शांती, ’साजरं’ करण्यासाठी निमित्त इत्यादी इत्यादी. थोडीफार फिरवाफिरवी केली तर ते गोकुळाष्टमी, नवरात्र, दिवाळी या सगळ्या सणांनाही लागू पडतात. पण अर्थपूर्णता संपून गेलेली प्रतीकं निव्वळ कर्मकाडातल्या गंमतीसाठी जपणं मला करायचं नसेल, किंवा मुळात मला त्यात फारशी गंमत येत नसेल, तर ती न करण्याचं, तिच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य मला असणार आहे की नाही हा मुद्दा आहे. की तिथेही भावना दुखावल्या अशी सोईस्कर बोंब आपण मारणार आहोत?

Saturday 13 October 2007

तीच तर गंमत...

पुन्हा एकदा मी का लिहितेय त्याचं समर्थन करणार होते॥ पण नको। डझण्ट मेक एनी सेन्स. :)

आत्ता आपण खरोखरच एकमेकांच्या समोर नसतो तर फार बरं झालं असतं। माझा जीव खरोखरच इतका अडकला आहे का तुझ्यात, की हे नुसतेच आकर्षणांचे मोह... हट्टीपणाने घर-दार व्यापून बसलेले... ते पडताळून पाहता आलं असतं. समोर माणूस नसताना, तो तसाच्या तसा जागता राहिला मनात... कुठलंच प्रतीक वा मृत आठवण बनून न राहता... जिवंत संवाद घडला त्याच्याशी तो समोर नसूनही... तर म्हणावं... की होय, माझा जीव गुंतला आहे तुझ्यात.

पण आत्ता?

आत्ता तू रोज दिसतोस. एकमेकांच्या अवस्थांचे अंदाज न लावण्यातच सगळी असेल नसेल तेवढी शक्ती खर्च होऊन जाते. रात्रीला आपण पार कंगाल. विखुरलेल्या स्वत:ला कसंबसं गोळा करून निवार्‌याला जाऊन पडणे एवढं एकच माफक ध्येय जपू शकणारे. कसली स्वप्नं आणि कसली ध्येयं...

म्हणून जमेल तितक्या लवकर तुझ्या डोळ्यांसमोरून उठून जायचंय. तू खरंच मजेत आहेस का..... हा विकृत प्रश्न नको आणि जीवघेणे अंदाज नकोत. स्वत:ची रोज उठून परीक्षा पाहणं नको आणि तुझी घेऊन तुला नापास होताना पाहणं नको. माझी गोची किती अवर्णनीय सुरेख... तू पास झालास तरी मलाच दुखणार आणि नापास झालास तरी स्वत:वर संतापून मीच कळवळणार! आहे की नाही मजा?

काय अर्थ?

कुणास ठाऊक...
आत्ता उद्धृत करायला सौमित्रची एक भीषण सुंदर कविता आठवतेय... पण नको.... कविता नकोत.

असेच वार्‌यावरचे निरुत्तर करणारे अनेक प्रश्न...

आणि आपण नुसते पाहत बसलेले... अगतिकपणे.

तो विचारतो मग स्वत:लाच... ’काय अर्थ?’

तर अर्थ काहीसुद्धा नाही...

जगातल्या सगळ्या कविता साल्या कुठेतरी खोल पुरून टाकल्या पाहिजेत.
कदाचित मी नीट नॉर्मल वागीन.
कुणास ठाऊक. कदाचित नाहीnaahiihii..
मग कदाचित मी स्वत:च लिहीन एखादी कविता नाईलाजानं. काय अर्थ?तर अर्थ काहीसुद्धा नाही!



मरो.......
सालं स्वत:चं असं काहीतरी सापडायला पाहिजे. म्हणजे जगदीशचंद्र बोसांना कशी झाडं सापडली, किंवा व्हॅन गॉगला रंग-रेषा किंवा सौमित्रला शब्द.... स्वत:मधली असेल नसेल तेवढी सगळी मस्ती, सगळी ऊर्जा... आत उसळणारं हे सगळं सगळं... तिथे उधळून टाकायचं...
कधी सापडेल? शोधत राहायला पाहिजे. स्वत:पासून सुटण्याचा तेवढाच एक मार्ग. शोधला पाहिजे. काय वाट्टेल ते झालं तरी शोधला पाहिजे..... मरायच्या क्षणापर्यंत शोधत राहायला पाहिजे.....त्यात हे असे दुखण्या-खुपण्याचे रस्ते अनिवार्यच. त्याची भीती नाही. दुखण्याच्या भीतीनं पाय मागे घेतला असता, तर इथवर आलेच नसते...मला दु:ख हवं, सुख हवं, अपेक्षा हव्यात, अपेक्षापूर्तीच्या अपेक्षा हव्यात आणि अपरिहार्य असतील तर अपेक्षाभंगही... सगळं सगळं हवं. दोन्ही हातांनी भरभरून हवं.. कितीही रक्ताळला जीव तरीही..
’जगातलं एकपण सुख नाही सोडणार...’ असं म्हणाला होतास तू, अगदी फिल्मी उत्कटपणे, दूर क्षितिजापार वगैरे नजर रोखून... आठवतंय? किती शर्थीनं निभावलंस ते! आणि मीही. फक्त आपल्या संदर्भबिंदूंची पाऽऽर उलटापालट झालेली. तीच तर गंमत...

Thursday 11 October 2007

बाकी सारे तसे आलबेलच...

तसा दुष्काळ नाही

आणि वादळ-बिदळही.
सूर्य उगवतो, चंद्र मावळतो,
दुपारींमागून संध्याकाळी,
संध्याकाळींमागून रात्री,
एका लयीत उलगडत जातात.
पाऊस-बिऊसही पडतो सालाबादप्रमाणे नियमित.
सारे तसे आलबेलच.


काही झाडे मात्र अबोलपणे सुकत जातात.
पानांचा जगण्यातला रस संपून
त्यांनी झाडाची बोटे अलगद सोडून द्यावीत,
ऊन-पाऊस सोसत मुकाट उभे राहण्याखेरीज
खोडालाही काही सुचूच नये,
फुला-फळांनीही आतल्या आत घट्ट मिटून घ्यावे स्वत:ला
एखाद्या गरिबाघरच्या अपंग वेडसर मुलासारखे
निमूट समंजसपणे,
तसेच.
तसेच घडत जाते सगळे
काही झाडांच्या बाबतीत.


तसा दुष्काळ नाही आणि वादळ-बिदळही..
सूर्य-चंद्र, दिवस-रात्र, उन्हाळे-पावसाळे...
पाऊसही पडतो नितिमत्तेचे सारे संकेत पाळत सालाबादप्रमाणे नियमित.


काही झाडे मात्र या सगळ्यातून निर्विकारपणे उठून गेलेली.
बाकी सारे तसे आलबेलच.

***


उद्मेखून तुला टाळत कामा-बिमाचे कृत्रिमपणे उभे करत नेलेले ढीग। तुझ्यातून आरपार पाहत लोकांशी मारलेल्या गप्पा. महत्प्रयासानं का होईना, पण चेहरा पुरता कोरा करून निभावलेल्या काही सोशल वेळा. कडेकोट बंद करून घेणं निर्दयपणे.


तेव्हा तुला प्रथम इतकं निर्लज्जपणे हताश झालेलं, त्यातून मला खवचटपणे टोमणे मारताना पाहिलं। तेव्हा चुकचुकली होती पहिली शंकेची पाल. वाटलं, मित्रा, तू नसणार आहेस. लेट मे गेट यूज्ड टु इट... का दोन दगडांवर पाय ठेवायला पाहतो आहेस?


पण इतकं सोपं थोडंच असतं? अजून बर्‌याच वाटा काटायच्या शिल्लक...


***


मीटिंग्ज्‌, रिपोर्ट्‌स, टारगेट्स आणि अचीव्हमेंट्स। आयुष्य कसं यथासांग यशस्वीपणे आणि बिनबोभाट चाललंय असं स्वत:लाच समजावत राहण्याचे रस्ते आपल्याला मिळाल्यासारखे. शक्यतोवर एकमेकांना टाळणं, गोष्टी ऐकून न ऐकल्यासारख्या करणं, समोरसमोर यायची वेळ आलीच तर दात काढून ती साजरी करणं या सगळ्या आयुधांचा वापर करण्यात आपण एकदम तरबेजच झाल्यासारखे.


अशात कधीतरी एकदा भंकस करत असताना कुणीतरी तुझ्या मनगटावरच्या ओरखड्यावरून तुझी यथेच्छ चेष्टा करायला घेतली। ’मी इथे असणं बरोबर नाही’ असं म्हणून धडाम्‌दिशी तिथून उठून जाण्याचं स्वातंत्र्य घेतल्यास गैरसमज होण्याची शक्यता असल्यामुळे मी चुपचाप पुतळा होऊन जागच्या जागीच गप. ’लाज तर वाटतेय, पण एरवी माझ्या अनुपस्थितीत हसत बेदरकारपणे उडवून लावली असती अशी गोष्ट आता नको इतकी अवघड होऊन बसलीय...’ अशातली तुझी गत. खोटं कशाला बोलू, उठून जाता येत नाही म्हटल्यावर, आय स्टार्टेड एन्जॉइंग इट. शेवटी तुझा गोरामोरा चेहरा न पाहवून, मीपण मस्करीत भाग घेतल्यासारखं केलं आणि हसत हसत उठून चालती झाले.


तेव्हा तुला हायसं वाटल्याची नोंद घेतली होती, पण मी हसत उठून गेल्यावर तुझा झालेला, कळे-न कळेसा अपेक्षाभंग? असूयेचा धागाही नाही उरलेला... अशी हताशा? प्रामाणिक खरं-खुरं दु:ख? कुणास ठाऊक। तेव्हा हे सगळं नोंदायचं राहूनच गेलं....


***


असाच कधीतरी धीर करून माझ्या डेस्काशी गप्पा मारायला आला होतास तू. मीपण निर्ढावून निवांत गप्पा मारल्या काफ्फा आणि मिलेनाच्या पत्रांवर. मराठी नाटकांवर. शाहरुखच्या इण्टेन्सिटीवर. इंग्रजी वृत्तपत्रांवर.


बोलता बोलता सहज बोलल्यासारखं करत म्हणालास - आमच्या घरी इंग्रजी पेपर फक्त मीच वाचतो. नाटकं-बिटकं काय आम्हांला आवडत नाहीत। आणि पुस्तक वगैरे तर माफीच....


तेव्हा कुणीतरी कानफटीत मारावी तसा माझा चेहरा झाल्याचा माझा मलाच नीट आठवतो। म्हणजे एखादी गोष्ट मोडून बाहेर पडण्याचे गट्स नाहीत आपल्यात, तर त्याचा दोष बरोबरच्या माणसाच्या सो-कॉल्ड सामान्यपणाला देणार तू? आणि अशा तुला मी इतकं माझं म्हणावं? आत्ताच्या आत्ता इथून उठून चालतं व्हावं, वणवणावं उन्हातान्हातून, किंवा निवांतपणे झोपावं घरी जाऊन... कुठेही असावं, पण इथे असू नये असा लालभडक संताप आल्याचा आठवतो स्वत:चाच.


मग अशा अनेक वेळा येत गेल्या आणि मी बोलणंही टाळायला लागले नकळत...


***


तरीही तुझ्या वाढदिवसाला तुला चार जणांसारखं ’हॅपी बर्थडे’ म्हणणं नाहीच जमलं मला। ’काय देऊ’ असं विचारलंच मी. पुरेसे आढेवेढे घेऊन माझ्यावरच उपकार करत असल्यासारखा ’पुस्तक दे, पण नाव नको घालू, म्हणजे मी निवांतपणे वाचीन...’ असं म्हणालास, तेव्हा वाटलं, आता कसं, अगदी शेवटची वीट रचून कुणीतरी पुरं चिणून टाकावं तसं सगळं नीट पुरं झालं!


***


नीती-अनीतीच्या सर्वमान्य संकेतांमधले आणि असल्या कुंपणावरच्या बेईमानीमधले वाद तर पहिल्या दिवसापासून घालत आलो आपण.


आता प्रात्यक्षिकांतून तावून-सुलाखून बाहेर पडण्याचे दिवस।


हे सगळं इतकं अवघड असणारेय हेही ठाऊक होतंच. पण तरीही वाटा काटून संपवण्याचे दिवस.


तुझा आणि तुझ्यापेक्षाही स्वत:चा इतका कडकडून राग राग करतानाही एक मात्र येतं मनाशी अजूनही। वाटतं, या सगळ्या भ्याड तडजोडींच्या पलीकडे एक दिवस असा येईल, जेव्हा तुला स्वत:ला जाब द्यावा लागेल... तेव्हा काय होईल तुझं? तेव्हाच्या तुझ्या भीषण एकटेपणाच्या जाणिवेनं पोटात अक्षरश: खड्डा पडतो...


सालं हे तुझ्या काळजीनं पोटात खड्डा पडणं थांबेल ना, तर बर्‌याच गोष्टी सोप्या होतील...


अर्थात बर्‌याच गोष्टी बिनबोभाट मरूनही जातील...


चालायचंच. इतक्या सगळ्या पसार्‌यात काही झाडं जगली काय अन्‌ मेली काय...


बाकी सगळं आलबेल असल्याशी कारण... ते तसं आहेक

Thursday 4 October 2007

मला कंटाळा आलाय

बेक्कार खूप निष्क्रिय सुस्त उदासवाणा वांझोटा कंटाळा आलाय.

तो गेला की मग लिहा-बिहायचं बघू.

Tuesday 2 October 2007

जे जे उत्तम...

नंदन, टॅग केल्याबद्दल मनापासून आभार.


’जे जे उत्तम...’मागची नंदनची भूमिका इतकी नेमक्या शब्दांत मांडलेली आहे, की ती तशीच्या तशीच इथे देते:

(पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)


***


आपण रस्त्याने जाताना कुणी वळून तर पाहिले, पण नुसतेही पाहणार नव्हते, आणि अखेर आपल्या येण्याजाण्याने हवा तरी इकडची तिकडे हलते की नाही असेच वाटायला लागते. कुणाचे काही कारणाने लक्ष जावे असे आपल्यात काही नाही ही शंका जरी मधूनमधून आलेली असली तरी तारुण्यसुलभ आशेने तिच्याकडे दुर्लक्ष करायला पहिलेले असते; पण तो आशावाद किती मूर्ख आहे हे मनापासून आणि उपकार करायच्या हेतूने गळी उतरवण्यात आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना जेव्हा अपेक्षेबाहेर यश येते, तेव्हा (आपणच शोधून काढलीय जणू, अशी!) एक कल्पना काही काळ आधारभूत होते: आपल्या भल्या-बुर्‌या कसल्याही बाह्य रूपाच्या आत डोकावू शकणार्‌या कुणा विशेष संवेदनाक्षम आणि काकदृष्टीच्या अंतर्ज्ञानी व्यक्तीला आपल्या मनाचे आणि बुद्धीचे गुण दिसतील (जे आपल्यात आहेत असे सगळ्यांना वाटते) आणि ती आपल्याला जवळ करील. अर्थात ’ती’ व्यक्ती म्हणजे एक पुल्लिंगी माणूस, (आणि कल्पनाच करायची तर का नाही?) देखणा, हुशार, श्रीमंत इ. इ. अशी माफक अपेक्षा (मूर्खासारखी)! पण तिच्यातही राम नाही हे (खरे तर मूर्ख नसल्यामुळे) उमजते आणि मग उरते एक नैसर्गिक ऊर्मी: स्त्रीलिंगी मनुष्य म्हणून जी एक मर्दुमकी - म्हणजेच औरतकी - गाजवता येण्यासारखी आहे, ती बिनबोभाट गाजवावी. ह्या ऊर्मीमागेही आशाळभूत विश्वास असतो, की आपण निर्माण केलेल्या त्या माणसाला तरी (काही काळ) आई म्हणजे बिनतोड परिपूर्णता, असे वाटेल! पण त्यासाठी हरतर्‌हेच्या तडजोडी करूनही जेव्हा सगळी वासलात लागते तेव्हा आधीच माफक असलेला आत्मविश्वास संपूर्ण नष्ट होतो. खांदे पाडून, मान कासवासारखी आत घेऊन, शक्य तितक्या निरुपद्रवीपणे आयुष्य काटताना एकच मागणी उरलेली असते: इतका काळ जसा कुणाच्या नजरेस न पडता काढला तसा उरलेलाही काढून कुणाला तोशीस न पडता होत्याचे नव्हते होऊन जावे.


आयुष्याच्या अशा आखीव आणि ’सुरक्षित’ टप्प्यावर जेव्हा ध्यानीमनी नसता जाणवते, की ज्यांच्याबद्दल विचार करायचे कैक वर्षांपूर्वी सोडून दिले होते ती ’अंतर्ज्ञानी’ माणसे जगात आहेत, इतकेच नाही तर सरळ पुढ्यात उभी राहून विचारताहेत, की तुमच्या मनाची आणि बुद्धीचे जे गुण (ते आपल्या ठायी आहेत ही समजूतही तोपर्यंत सोडून दिलेली असते) आम्हांला दिसताहेत त्यांचे तुम्ही काय करताहात? तेव्हा मग चाकोरीत स्तब्ध उभे राहून स्वत:संबंधे पुनर्विचार करायचा येऊन पडतो.


हे कठीण, कारण आयुष्याची इतकी वर्षे आपण फुकट घालवली की काय, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर द्यायची तयारी करायला लागते. बहुतांश लोकांनी ठरावीक मार्गाने वाटचाल करण्यात ज्यांचे भले असते अशांनी आखून दिलेल्या मार्गाने आपण आजवर का चालत आलो? आणि तेही त्याच्यात आपले फारसे भले दिसत नसताना? कुठलेही प्रश्न न विचारता पुढे जाणार्‌या आळशी अथवा अंध अथवा हतबल अथवा प्रवाहपतित जनांच्या ओघामागून आपण पावलामागे पाऊल का टाकत राहिलो? काही रूढ कौटुंबिक वा सामाजिक संकेतांत ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांची हुकूमशाही का सहन करत आलो? त्या नव्या ’अंतर्ज्ञानी’ मित्रांनी विचारलेल्या प्रश्नाचे प्रतिध्वनीच जणू, असे हे सारे प्रश्नही जेव्हा मनात अखंड आणि कर्कशपणे निनादू लागतात, उत्तरांसाठी हटून बसतात, तेव्हा आजवर मुकाट काटली त्याव्यतिरिक्त दुसरी वाट कुठे आहे का याचा शोध घेणेही भाग पडते.


- ’मुक्काम’, गौरी देशपांडे


***


मी या मंडळींना टॅग करतेय -




मॅड्‌झ

Friday 31 August 2007

देणार्‌याने देत जावे...


"...आपल्या संवेदना व भावना तीव्र आहेत, आपल्याला अनुभवाच्या अर्थाचा विचार बर्‌यापैकी करता येतो, कल्पनाशक्तीची व भाषेची देणगीही अगदीच वाईट नाही, मूल्यभाव सूक्ष्म आहे, वगैरे गोष्टींचे भान मला फार लवकर आले. पण त्याच वेळी असेही कळले की निसर्गाने आपल्याला या सर्व शक्तींना सामावून घेणारी व त्यांच्यापलीकडचा अज्ञात प्रदेश उजळवून टाकणारी नवनिर्मितिक्षम शक्ती दिलेली नाही. त्या प्रदेशातल्या अंधूक आकृती क्वचित भासमान होतात; क्वचित त्यांच्या निगूढ गीतांचे सूर ऐकू आल्यासारखे वाटतात. पण तितकेच वाटते, त्या सार्वभौम शक्तीपासून असे वंचित राहण्याचा शाप जर द्यायचा होता, तर आधीचे सर्व दान कशाला दिले? मग ध्यानात आले की त्या दानाच्या बळावर आपल्याला दुसर्‌याच्या निर्मितीत सावलीसारखी सोबत करता येईल; कदाचित ’झाडू संतांचे मार्ग’ म्हणतात तशा रीतीने कलावंतांच्या वाटा साफ व स्पष्ट करता येतील. तेच आपले श्रेय असेल आणि ते कमी मोलाचे नाही. आपण जीव ओतू तितके ते वाढेल. संपादन-प्रकाशनाच्या कामात मी ते शोधले आहे, अगदी जिवानिशी शोधले आहे आणि त्यातला आनंद घेतला आहे..."


खरे पाहता तुमचे जाणे जाणवावे असा आपला थेट संबंध कधी आलाच नाही. तो येण्याची शक्यताही नव्हती.


तुमचे क्षेत्र साहित्याचे. वाचणारी माणसे कुठल्याही युगात वाचतातच आणि न वाचणारी कधीच वाचत नाहीत हे जरी खरे असले तरी, आमचे युग वाचण्या-बिचण्यासारख्या ’निरुपयोगी’ आणि ’अनुत्पादक’ गोष्टीकडे सहजसाध्य तुच्छतेने पाहणारे. औचित्य सांभाळणे हा तुमचा वृत्तिविशेष. आणि गरज पडली तर नेसूंचे सोडून डोक्याला गुंडाळण्यातही काही वावगे नाही असे मानणारी आमची पिढी. केल्या कामाचेही श्रेय घेण्याचे तुमच्या जिवावर येई. आणि ’नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी’ हे तर आमचे ब्रीदवाक्य. अशा दिवसांत तुम्ही सार्वजनिक आयुष्यातून जवळ जवळ निवृत्तच झाला होता यातही नवल करण्यासारखे काही नाहीच.


तरी तुमचे जाणे इतके जाणवत राहावे, असे आणि इतके तुम्ही माझ्या मनात कसे रुजून राहिलात, असे कोडे पडले आहे.


वाचण्याच्या आवडीचे सवयीत आणि पुढे गरजेत रूपांतर होत गेले तसतशी पुस्तके जमा होत गेली माझ्याजवळ. कुण्या वडीलधार्‌या माणसाने माझी पुस्तके पाहताना सहज म्हटले, ’अरे, ’मौजे’ची पुस्तके बरीच दिसतात की.’ तेव्हा त्या अडनिड्या वयात मी ’मौजे’च्या देखणेपणाची प्रथमच जाणतेपणी दखल घेतली आठवते. नीटस देखणी, नजरेला सुखावणारी मांडणी. पानांचा तो विशिष्ट पिवळसर रंग. (कुणीतरी अडाण्यासारखे ’ही पुस्तके पिवळी पडलेली आहेत’ असे म्हटले तेव्हा त्याची कीव तर वाटली होतीच. पण नकळत ’का बरे आवडतो हा रंग’ असा चाळाही सुरू झाला मनाशी. काही पुस्तकांच्या भगभगीत पांढर्‌या पानांच्या तुलनेत त्या लोभस पिवळसर पानांत एक अनाक्रमण, आकर्षक साधेपणा असतो. सेपिया टोनसारखा? कुणास ठाऊक...) राजमुद्रेसारखा ’मौजे’चा तो शिक्का. म्हटले तर प्रथमदर्शनी जुनाट वाटेलसा. पण त्या जुनेपणातच खानदान आणि भारदस्त आकर्षण घेऊन असणारा. अर्थपूर्ण आणि सुरेख मुखपृष्ठे. शुद्धलेखनाचा आणि मुद्रणाचा विलक्षण अचूकपणा. (एकदा कधीतरी एका अक्षराला द्यायचा राहून गेलेला काना सापडला होता, तेव्हा मी आधी आश्चर्यानं शब्दकोश पाहून आपल्याला ठाऊक असलेला शब्दच बरोबर आहे ना, अशी खात्री करून घेतलेली आठवते! हो, ’मौजे’च्या पुस्तकातला शब्द कसा चुकीचा असेल?!) आणि या सर्वांवर ताण म्हणजे एकाहून एक सरस दर्जा असलेल्या, चाकोरीबाहेरच्या वाटांवरच्या साहित्यकृती. मराठीच्या साहित्यविश्वात मैलाचे दगड ठरतील अशा तर कित्येक...
तसेच ’मौजे’चे दिवाळी अंक. वर्षानुवर्षे जपावेत असले चिरेबंदी साहित्य असलेले ते अंक. कधी कुणाच्या कविता आवडीनं वाचण्याचा मला कंटाळा. पण ’मौजे’तल्या कविता आवर्जून वाचाव्याशा वाटत गेल्या आणि मग नकळत कविता वाचण्यातला आनंद रुजत गेला मनात...


खरं तर तुमचा माझ्याशी आलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध काय तो इतकाच. ’सत्यकथा’ ही गोष्ट मला तरी ’स्वातंत्र्यलढा’ किंवा ’आणीबाणी’ या गोष्टींसारखी आणि या गोष्टींइतकीच अपरिचित. फार दंतकथा असणारी, फार दूरची आणि त्यामुळे ’माफक रोमांचक’ या विशेषणापलीकडे न जाणारी.


मराठी साहित्यानं कात टाकण्याच्या त्या दिवसांत म्हणे ’सत्यकथे’नं सार्‌या चाकोरीबाहेरच्या लेखकांना हक्काचं व्यासपीठ दिलं. सगळ्या वादांत, विरोधाच्या गदारोळात, टिंगलटवाळीतही खंबीर आणि सक्रिय पाठिंबा दिला. प्रसंगी ’प्रस्थापितांचा संकुचित संप्रदाय’ अशी हेटाळणी ऐकूनही अभिजात प्रयोगशील साहित्याचा आग्रह सोडला नाही, तसाच विरोधी मतप्रवाहांची दखल घेण्याचा सर्वसमावेशक सुसंस्कृतपणाही सोडला नाही. म्हणे...


या सार्‌या ऐकल्या-वाचलेल्या, सांगोवांगीच्या गोष्टी. मला प्रत्यक्ष दिसत राहिला तो ’मौजे’बद्दलचा पुस्तक जगातला सकारण आदर आणि दबदबा. मनोहर जोशी-विजय तेंडुलकर वादातही ’घडला तो प्रकार दुर्दैवी होता. पुरस्कार कुणाच्या हस्ते द्यावा हे मी संस्थेला सांगणं उचित नाही’ इतक्याच मोजक्या शब्दांत तुम्ही सुसंस्कृतपणे व्यक्त केलेली प्रतिक्रिया. निरनिरळ्या कुळांच्या, वयांच्या आणि प्रवृत्तीच्या लेखक-कलावंतांनी तुमच्याविषयी वेळोवेळी प्रकट केलेली आदराची आणि आपुलकीची वादातीत भावना. लेखनासारख्या व्यक्तिनिष्ठ सर्जनप्रक्रियेतही तुमचा मोलाचा हातभार लागल्याबद्दल व्यक्त केलेली सुंदर कृतज्ञता. प्रत्यक्ष साहित्यनिर्मिती न करताही तुमच्या अक्षरश: अजोड कामासाठी तुम्हाला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळावे हा कुणीकुणी कृतज्ञभावाने केलेला आग्रह. तुमच्या नावे लिहिल्या गेलेल्या कित्येक अर्पणपत्रिका...


या सार्‌याबद्दल आभार मानणेही काहीसे अपुरे, औपचारिक आणि उथळ वाटेल.


तुमच्या सर्जनाच्या अभिव्यक्तीसाठी इतका वेगळा, विधायक रस्ता शोधलात तुम्ही. आणि किती देऊन गेलात... तुम्हीच तुमच्या एका पत्रात म्हटले आहे तसे चंद्रबिंबाची कळा वाढवून गेलात... तुमचेच शब्द परत एकद उद्धृत करून थांबणे औचित्याला धरून होईल...
"...काल संध्याकाळी चांदणे सुंदर पडले होते. गच्चीवर त्यात बसावे असे फार मनात आले, पण गेलो नाही. अशा नीरव चांदण्यात एकटेपणा सोसत नाही... वाटते, चांदण्याचे दूध मिसळून मऊ झालेल्या शांततेत सर्वांगी न्हाऊन निघावे व विरघळून जावे, किंवा तळ्यातल्या कुमुदाप्रमाणे शरीर-मनाच्या पाकळी-पाकळीने उमलत जावे आणि त्या चांदण्याला किंवा चंद्रबिंबाला अभिमुख होऊन भरून यावे आणि अंतर्बाह्य निवून गात्रागात्रांत ती सुगंधी चापेगौर शीतलता भिनवून घ्यावी, किंवा दुरून एखाद्या मधुर घंटेचा मंद वलयांकित निनाद ऐकावा, किंवा सनईसारख्या गोड व आर्त स्वराचे कण रंध्रारंध्राचे कान करून ऐकावे... आणि हे जडकठोर शरीर त्या सुखात न कळता विरून जावे... आत्म्याची क्षीण ज्योत चंद्रबिंबात विलीन होऊन त्याची कळा वाढली तर वाढावी... आपण उरूच नये..."

Saturday 11 August 2007

बरेच काही उगवून आलेले...

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूंच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...


***

अगदी सुरुवातीच्या काळातली कधीतरीची ही गोष्ट. ’नऊ तासांपलीकडे मी तुमचं काहीही देणं लागत नाही’ अशा बाणेदार आणि शुगर कोटेड्‌ तुसडेपणातून जमतील तेवढ्याच गप्पा मारणं सोडून मी जरा जरा माणसांत यायला लागले होते तेव्हाची. घरी परत जाताना गाडीत कुठल्याश्या देव-आनंद-कालीन गाण्यावर खूश होऊन मी मारे आवाज वगैरे वाढवला. त्यावर स्पष्ट नाराजी नोंदवणारं तुझं ’च्‌च्‌’ ऐकून, मागे वळून भिवया उंचावल्या असाव्यात मी. तेव्हा म्हणाला होतास, "हे बरंय... नाही आवडत एखादी गोष्ट असं म्हणायचीपण चोरी! थेट माझ्या अभिरुचीवरच उठणार म्हण की..."

तुझी मळल्या वाटेबद्दलची बेफिकिरी तेव्हाच नोंदली मी.

मग कधीतरी संदीपच्या 'पाडू' कवितांबद्दल त्याला शिव्या घालत होते मी, तेव्हा बोलता बोलता सहज बोलल्यासारखा, "'पाडू' तर 'पाडू', पण आपल्यात आहे का कवितांचा जाहीर कार्यक्रम करण्याची हिंमत? आपण फक्त पगाराचे आकडे फुगवण्यात काय ती खर्डेघाशी दाखवणार. कविता करायला आणि त्यावर जगायला जिगर लागते...बसून शिव्या देणं सोपं असतं," असा शांतपणे टाकलेला बॉम्ब.

मी भिवया उंचावायलाही विसरून गेले असणार...

***

हे नेमकं कधीचं ते मला आठवत नाही. ’बोलायला नको होतं ते बोलून तर बसलो आहोत, आता या टोपीतून कोणकोणते ससे बाहेर येतात ते पाहायचं’ असा हताश मूड सोडून आपण जरा गप्पा-टप्पा करायला परत सुरुवात केली होती त्या काळात असावं. मी ते सगळं ’सिगारेट’ प्रकरण तुझ्या पुढ्यात आणून टाकलं होतं, म्हटलं तर निरागसपणे, म्हटलं तर थोडा अंदाज घेण्याच्या पवित्र्यात. काय तरी प्रेक्षणीय गोची होती खरंच! एकीकडून तू हा सगळ्या आचरट प्रकारातली गंमत समंजस मित्रासारखी समजून पोटात घालावीस ही अपेक्षा आणि दुसरीकडून तुला भडकवण्याच्या माझ्या क्षमतेचा झालेला मनस्वी विकृत आनंद... तुझंही तेच! माझं हे असले आचरट प्रकार करून पाहणं आवडतं आहे, समजतं आहे कुठेतरी आणि तरी पोटातून वाटलेली काळजी दडवता येत नाहीय...
खरं तर निघायची वेळ ऑलमोस्ट उलटून गेलेली, पण जाणार कशी मी? मी विचारलेल्या एका बिनतोड सवालाचं उत्तर दिलं नव्हतंस तू! ’लिही ना उत्तर, थांबलेय मी’ असं म्हणून मी तुझ्या मागे उभी राहिले, तेव्हा अजूनच कोंडीत पकडल्यासारखी अवस्था तुझी. ’तू जा इकडून, मी लिहितो’ असं म्हणून मला हाकललंस आणि ते वाक्य उच्चारलंस स्वत:शीच हताश होऊन पुटपुटल्यासारखं -

"कधीतरी विचार करावा माणसानं थोडा..."

पुढच्या सार्‌या पडझडीची स्वच्छ जाणीव व्हावी अशा सुरात, स्वत:च्या वाहवत जाण्याला आणि त्यातल्या अपरिहार्यतेला उद्देशून उच्चारलेलं ते वाक्य. कुणी पाहू-ऐकून विटाळू नये असं आणि इतकं खाजगी.

ते ऐकलं आणि डोक्यातली सगळी अटीतटी, राग, तडफड संपून फक्त एक उदास आनंद तेवढा उरला मनात...

***

’मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा...’ अशातली गत असतानाही हट्टानं दिवसचे दिवस भिजून लुटलेला पाऊस. यशराज फिल्म्सची हिरॉईन असल्याच्या थाटात चंद्राकडे दिमाखानं पाहत रचलेल्या कविता. सिनेमे पाहण्यात बुडवून टाकलेल्या संध्याकाळी. पुस्तकं, नाटकं, मित्रमंडळी...

आणि तरीही ग्रेस म्हणतो तसा ’बुबुळांच्या शुभ्रतेत रुतलेला चंद्र’ आपला अभंगच...

***

’पळून जायचं नाही’ या तुझ्या वेडगळ आव्हानासमोर मूर्खासारखी मान तुकवून आपण आयुष्य परत चालू केलेलं. ’जमतंय की आपल्याला’ अशा आश्चर्यात मी दंग असताना तू चक्क म्हणावंस, "मी जातो दुसरीकडे कुठेतरी..."? ठिकाय, आपली त्यालाही ना नाही! पण ’मला इथे काहीच मिळत नाहीय माझ्या मनासारखं, मी जातो...’ या तुझ्या कांगावखोर प्रस्तावावर बॉसनं तुला काय म्हणावं?

’प्रूव्ह युअरसेल्फ ऍण्ड देन गो. पळून जाण्यात काय गंमत आहे?’

हा हा हा!!!

तू अर्थातच थोबाडीत मारल्यासारखा गप्प! तुझा चुपचाप थांबण्याचा निर्णय ऐकून त्या बॉसला बिचार्‌याला वाटलं असेल, काय भन्नाट तत्त्वज्ञान ऐकवलं आपण...त्याला काय ठाऊक ही कहाणीमागची कहाणी?
हे रामायण ऐकून हसावं की रडावं ते मला कळेना. स्वत:शी नसती युद्धं खेळण्यातून सुटका होता होता राहिली म्हणून नाराज व्हावं की तुझी पुरती जिरवणार्‌या या काव्यात्म न्यायावर खूश व्हावं असला भन्नाट प्रश्न माझ्यासमोर.

पण तुझा "सही जिरली ना माझी?" असा प्रश्न घेऊन असलेला गंमतीदार चेहरा बघून मग जे हसायला यायला लागलं, ते आवरेचना...

***

अलीकडे तसे आपण एकमेकांना आणि एकमेकांपासून जपून असतो. तशी भंकस, मस्करी, गप्पा-टप्पा, मस्ती आणि हमरीतुमरीवर येऊन केलेली भांडणं अजूनही चालतात आपली. समोरच्या माणसाला नेमका कसला राग येईल हे उमजून मुद्दामहून त्याचा अदमास घेत काडी टाकणं, तो अपेक्षेप्रमाणे भडकला की मनमुराद हसणं, चिडणं, चिडवणं...

पण एक आवर्तन पुरं झालं आहे आता.

आता प्रदेश पावलांना पूर्वीइतके अपरिचित नाही राहिलेले.

बरेच ऊष्ण गतिमान प्रवाह आता वरच्या संथ-शांत प्रवाहाखाली.

पोटातून अपार माया. भावी विध्वंसाची बीजं पाहताना दाटून येणारी काळजी. एकमेकांचं पोरपण जपण्यासाठी केलेली धडपड. न दिसणार्‌या शेवटाची भीती आणि अनामिक आकर्षणही...

’मी दोन ओळींच्या मधे कधीच काहीच पेरत नाही’ असं कितीही ठामपणे म्हणालास तू, तरी -

मधल्या काळात बरेच काही उगवून आलेले...

Thursday 19 July 2007

तुम्ही कधी तुमचा एको पॉईंट शोधलाय...?

(शीर्षक: ’...आणि तरीही मी’मधल्या सौमित्रच्या ’एको पॉईंट’ ह्या कवितेवरून.)

"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..."माझी चिल्लर स्वप्नं ऐकून माझा एक मित्र कळवळून म्हणाला होता!

तेव्हा त्याच्याशी वाद घालणं राहून गेलं होतं. पण ते वाक्य आणि त्याच्यामागची त्याची सच्ची कळकळ डोक्यातून पुसली गेली नव्हती, नाही. तसंच त्याचं कुठेतरी काहीतरी चुकतंय, ही खात्रीही.

तर... हे काही प्रश्न मित्राला -

खरं आहे. काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य करायला हवंय.

पण ’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ म्हणजे नक्की काय रे? त्याच्या व्याख्या केल्या आहेस का तू तुझ्यापाशी नक्की? उदाहरणार्थ अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण म्हणजे मोठ्ठं? (हे फारच ढोबळ झालं नाही?! बरं, आपण जरा वेगळ्या शब्दांत मांडू - ) अमुक इतक्या माणसांच्या आयुष्याला आकार देण्याची ताकद मिळाली म्हणजे मोठ्ठं? किंवा अमुक इतके पैसे कमवले आणि उर्वरित आयुष्य अधिकाधिक मिळवत राहण्याची बेगमी केली म्हणजे मोठ्ठं? किंवा जगातल्या अमुक इतक्या ठिकाणी आपलं नाव छापून आलं, आपण अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात शिकण्याची, काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? याआधी कुणीच न केलेलं काही आपल्या हातून घडलं म्हणजे मोठ्ठं?

काय? मोठ्ठं म्हणजे नक्की काय?

खरं सांगू? हे निकष नाहीतच एखादी गोष्ट ग्रॅण्ड असण्याचे. मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस ठरू शकते. आणि जगाच्या लेखी कितीही क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते.

माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे...
माझ्या टीचभर आयुष्यातलं काय काय पणाला लागतं आहे...
मी किती बेभान सावधपणे खेळात उतरते आहे...
It matters...

हां, आपल्याला खुणावणारे असले खेळ शोधायलाच लागतात आयुष्यात. त्यातून सुटका नसते. ते शोधण्याचे रस्ते, त्यातल्या अडचणी, पुन्हा पुन्हा घेरत राहणारी निराशा आणि तिला वारत पुढे चालत राहण्याची आपली मस्ती... मिळेल... पुढच्या वळणावर असेल... असे स्वत:ला समजावताना येणारे वैफल्य आणि स्वत:च्या शहाणपणाबद्दल येणार्‍या रास्त शंका... हे सगळे अपरिहार्यच.

’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ या गोष्टीच्या व्याख्या मात्र आपल्या आपण ठरवायच्या.
आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा.

What say?

Thursday 5 July 2007

दोन ब्लॅकाउट्सच्या मधल्या प्रवेशासारखी एक संध्याकाळ!

पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल रूळ आणि ऐन जुलैचा वेडसर वारा. या सगळ्याला अपुरेपण येऊ नये म्हणून की काय - चक्क चुकार बगळ्यांची एक पांढरीशुभ्र माळ.

सोबतीला एकटेपण. आसमंतात भरून राहिलेलं. कधी कोसळेल अंगावर त्याचा नेम नाही, पण तूर्तास तरी दबा धरून असलेलं. पावसासारखंच काळोखी करून.

आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे हे कळण्याची सुतराम शक्यता नसलेली गर्दी पार्श्वभूमीला पसरलेली. आपापल्या क्युबिकल्समधे, आपापल्या फोन्सवर, पीसींसमोर मश्गूल. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एका काचेच्या दरवाज्याचं अंतर. मागे स्वत:ला कामात बुडवून घेतली इमारत आणि आपण असे वारा अंगावर घेत सज्जात उभे.

मागचं-पुढचं सगळं काही क्षणांपुरतं नि:संदर्भ करून टाकत. काळाच्या मागच्या तुकड्यावर जे घडलं आहे त्याची जबाबदारी खांद्यावर पेलत, येणाऱ्या वाटेवर काय असणार आहे याबद्दल उत्सुक, पण पुरते बेखबर. सावध आणि बेसावधही. पूर्ण त्या क्षणाचे होऊन जाऊ पाहणारे. वर्तमानाच्या सतत धावत्या, निसटत्या तुकड्यावर जिवाच्या कराराने पाय घट्ट रोवून उभे असलेले.

धडधडणाऱ्या निर्दय शहराच्या कुशीत मिळून गेलेली ही शांत-निवांत-जिवंत संध्याकाळ.

यापरता अधिक आनंदाचा क्षण काय असू शकतो?

एन्जॉय...

Friday 22 June 2007

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...

’रंजिशी सही...’ डोक्यात घुमत असलेलं. कुठल्याही गाण्याबरोबर चालताना अर्ध्या वाटेवर डोकं वाटा चुकायला लागतं तसंच... कधी आपली ’महान’ एकाग्रता चकव्यात गुंतवते, तर कधी गाणंच पायवाट सोडून रानोमाळ भटकायला भाग पाडतं...तशातली गत झालेली. रुना लैलाचा शांत, ठाम घायाळ सूर पाझरतो आहे एका लयीत. त्याची एक नशाच चढल्यासारखं झालेलं...

’कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इथे अडायला झालं.

भरम...?

खरी मी तिच्याही आधी ’तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ...’वर जाऊन तिची वाट पाहते नेहमी. पण ’मोहोब्बत का भरम रख...’? म्हणजे? पुढे जाताच येईना.

भरम...

इथे अपरिहार्यपणे मेघनाची आठवण झाली. किती वेगवेगळ्या प्रकारे या भ्रमांचं विश्व साकारलं आहे तिनं. भ्रमांचा आधार आयुष्याला जोडून ठेवणारा आणि त्यांना नाकारताना लागणारी प्रचंड अमानुष ताकद... लख्ख सत्य समोर दिसत असूनही ते नाकारून भ्रमांना कवटाळून बसण्यातली ’अठरावा उंट’मधल्या संजीवची अगतिकता... आणि ’टेलिंग दी ऍबसॉल्यूट ट्रुथ वॉज पार्ट ऑफ माय स्ट्रॅटेजी...’ म्हणून भीषण एकटेपणाला सामोरं जाणारी ’नातिचरामि’मधली मीरा...

भ्रमांच्या मोहक आधाराचं आणि फसवं आभासी सुख देण्याच्या क्षमतेचं किती नेमकं भान आहे तिला...

तशीच गौरीची कालिंदीही.

इतक्या साऱ्या तडजोडी करून जोडत तर काहीच नाही आपण...
तडजोडी मोडताना होणाऱ्या विध्वंसाचं काय?
आणि तडजोडी जगताना होणाऱ्या विध्वंसाचं?

हाही भ्रमांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा निकराचा प्रयत्नच की...

’तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरू,असे समजू नको तू की, तुला मी टाळतो आहे...’ असं म्हणतात सानेकर, तेव्हा हा ’मोहोब्बत का भरम’ असतो त्यांना खुणावणारा? असावा. नाहीतर ’तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे...’म्हणजे काय?

सरतेशेवटी हे सारे भ्रम?

नात्यांचे...कुणी आपल्यासाठी असण्याचे...कस्मे-वादें निभावण्याचे...प्राणांवर नभ धरण्याच्या आश्वासनांचे...स्वप्नांचे...

असूदेत. खोटे, अल्पजीवी, कधी ना कधी जमिनीवर आदळणारे.. असूदेत. तरीपण मला हवेत. समोरच्या माणसाला नेमकं काय आणि किती कळतं आहे त्याचे अंदाज बांधणंच हातात असतं फक्त...असं म्हणत चरफडत आले आहे मी नेहमीच. तरीही. भ्रमांची ताकद कळते आहे मला आता. मला नको आहे सत्य-बित्य इतक्यात. ते मीरालाच मिळू द्या. तूर्तास तरी आपल्याला नको. आपल्याला आपले भ्रम प्यारे आहेत..


कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ....

क्या बात है!

कधी ना कधी ’येह आखरी शम्माही बुझाने के लिए आ...’वर पोचायचंच आहे...
तोवर ’पिन्दार-ए-मोहोब्बत का भरम रख...’ इतकंच खरं...

Saturday 26 May 2007

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे...

खरंय...

आपल्याला कित्ती कित्ती वाटलं असं असावं म्हणून, तरी आपल्याला एकाएकी उडता थोडंच येणार असतं? नसतंच.

’आत्त्त्त्ताच्या आत्त्त्त्ता पाऊस हवाय’ असं कित्ती पोटातून वाटत असेल तरी आपल्यासाठी एप्रिलमधे पाऊस येतो थोडाच? नाहीच येऊ शकत.

’जगातल्या सगळ्याच्या सगळ्या संध्याकाळी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पुरून आपण विनासंध्याकाळच्या प्रदेशात राहायला जावं’ असं किती मनापासून वाटलं तरी संध्याकाळ चुकवता येते थोडीच? रोजच्या रोज देणेकऱ्यासारखी संध्याकाळ येतेच. ऑफिसातही येते...

’संदीपला खरंच कळत असेल का तो म्हणतो ते सगळं, की बाकी साऱ्यासारखा हाही भ्रमच?’ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावं असं किती वाटलं म्हणून ते मिळतं थोडंच? समोरच्या माणसापर्यंत नेमकं काय आणि किती पोचतंय, त्याचे अंदाज करणं तेवढं हातात आहे, हे कितव्यांदातरी कळून घ्यावं लागतंच.

ही मेघना पेठे एवढं सगळं समजूनसुद्धा एखाद्या निगरगट्ट आणि शूर माणसासारखी कसं पेलू शकते जगणं, असा आदरयुक्त अचंबा वाटला तरी आपण तिच्याएवढे शूर होऊ शकतो थोडेच? आपण परत परत त्याच त्या आशाळ तडजोडी करत राहतोच.

आपल्या काळजाच्या देठापासून हवं म्हणून, आपली जिवाजवळची गरज म्हणून ... काही घडत नसतंच.

’आवर्तन’मधली सुरुचीची बहीण नाही का म्हणते प्रॅक्टिकली - ’आपल्याला हवं असणं आणि ते मिळणं यांचा आयुष्यात एकमेकांशी काही संबंध तरी असतो का दीदी? तूच सांग.’

खरंय. नसतोच.

Monday 14 May 2007

रिश्तोंकी परछाईयाँ...

"भंकस ही कधीपण क्रिएटिव्हच असते..दर वेळी नवीन करावी लागते ना ती!"

"हे काय च्यायला, तुम्ही एखादी गोष्ट शिकवणार, म्हणून काय आयुष्यभराचे राजे? जमणार नाही."

असली त्याची मुक्ताफळं ऐकून सुरुवातीला मी त्याला सिरियसली घेतलंच नाही. तसा फारसा नव्हताच तो ऑफिसात. आधी हात मोडला म्हणून, मग पाय मोडला म्हणून; साहेब जवळ जवळ चार महिने रजेवरच होते. नंतरच आमची जरा जरा ओळख व्हायला लागली. संध्याकाळी फारच वैतागला तर गप्पा मारायला म्हणून येत असे तो माझ्या डेस्कजवळ. कॉलेजमधली मस्ती, फिल्म फेस्टिवल, नाटकं, संदीप, कंटाळा.... असल्या कसल्याही गप्पा. मग हळूहळू त्याचं एखादं वाक्यं नकळत डोक्यात राहून जायला लागलं.

”’आपण’ का नाही लिहित काहीतरी?"

"शोधा म्हणजे सापडेल. पण काय शोधायचं ते माहीत नाही, असंच झालंय ना ’आपलं’?"

"मग? पुढे काय शिकायचा विचार आहे ’आपला’? हे टीचर्स ट्रेनिंग का काय ते ’आपण’ नाही करणारे का?"

हा ’आपण’चा खास वापर - समोरच्याला ऑफ गार्ड पकडणारा. ही त्याची खास लकब लक्षात यायला लागली, तेव्हाच त्याला ’हॅपी गो लकी’ म्हणून टाईपकास्ट करायचं मी बंद केलं असावं. निमित्त त्याचं झालं. पण मग आजूबाजूची सगळीच, मी द्विमित म्हणून फुली मारून टाकलेली, माणसं माझ्या लेखी हळूहळू त्रिमित व्हायला लागली ती त्याच सुमारास.

सतत पॅटर्नल वागून समोरच्याला पंखाखाली घेऊ पाहणारा एक मित्र. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून त्याच्या आक्रमक पालकत्वाचा राग येऊ न देता त्यातली फक्त आस्था तेवढी उचलायला शिकत होते. मात्र त्यातही त्याचं समोरच्या माणसाबद्दलचे आडाखे बांधणं थांबत नाही हे जाणवलं तेव्हा मला ’जग उफराटं आहे’ असा धक्कादायक साक्षात्कार झाल्याचा आठवतो...!

नवीन काहीही करा-शिकायचा प्रचंड उत्साह असलेला एक मित्र. त्याचं फ़्रस्टेशन आणि ’क्या यार, कम से कम सपने तो बडे देखने चाहिये...तभी तो कुछ कर सकते हैं..’मधून लख्ख दिसणारा त्याचा निरागस स्वप्नाळूपणा. तो पाहूनच मी माझ्या निष्क्रिय कडवटपणाला दटावायला लागले नकळत.

जाड भिंगांचा चष्मा आणि चेहऱ्यावरचे ’बाळू’छाप निरागस भाव घेऊन असलेला एक मित्र. बोलता बोलता कधी विकेट काढेल याचा काही नेम नाही मात्र. ऐकणारा पार गारच.

पुरुष हा विषय आयुष्यातून एका समंजस शहाणपणाने बंद करूनही कडवट न झालेली एक मैत्रीण...

इतक्या सरळपणे - खरं तर मूर्ख म्हणावं इतक्या सरळपणे - वागून इतकी वर्षं कसे टिकले असतील इथे, असं आश्चर्य मला नेहमी वाटायला लावणारे फिलॉसॉफर बॉस...

ज्याला पाहून मला न चुकता दर वेळी भारत सासणेंच्या ’रंगराजाचा अजगर’ या कथेची आठवण येते, असली राजकारणं खेळणारा एक टीम लीडर. पण तशीच त्याची अंगावर घेतलेले पंगे एन्जॉय करत निभावून नेण्याची खुजलीही....

ही आणि अशी कितीतरी माणसं. जिवंत. आपापला इतिहास-भूगोल घेऊन येणारी. माझ्या असण्यावर रिऍक्ट होणारी. मला रिऍक्ट व्हायला भाग पाडणारी. एकाच वेळी प्रेमळपणे काही देऊ करणारी आणि त्याच वेळी आपल्या निखळ स्वार्थानं मला चकित करून टाकणारी...

त्यांच्या असण्याचं भान मला त्यानं पुरवलं. त्याचा तसा उद्देश होता असं अजिबातच नव्हे. कदाचित त्याचा अंगभूत चांगुलपणा असेल किंवा स्वत:चा अहंकार सुखावण्याची गरजही. किंवा दोन्ही. किंवा या दोन्हीबरोबर कुठेतरी काठ शोधायची माझी आत्ताची गरज.

काहीतरी झालं खरं.

म्हणूनच परवा तो बोलता बोलता सहज बोलून गेला ते वाक्य तेव्हा मी चमकले.

" तुला असं नाही वाटत मी बरेच दिवस तुझ्याशी बोलून या सगळ्याची तयारी करून घेतोय...? It's time to get married..."

म्हणजे? तू कोण माझ्या आयुष्यात काहीतरी ठरवायला येणारा? मी तो हक्क अद्याप दिलेला नाही कुणाला. इतकी माझी काळजी का करावी कुणी? मला नाही आवडत कुणी इतकं पर्सनल झालेलं...
अशा संतप्त, कडवट प्रतिक्रिया उमटून गेल्या डोक्यात. पण मागोमाग आवंढाही आला एकदम. पुढे-मागे काही बोलताच येईना. तो क्षण तसाच रेटून नेताना पुरेवाट झाली...

आणि मग कळलंच मला एकदम - इतके दिवस या माणसांना खोटी खोटी, आपल्या आयुष्यात नसलेली, निव्वळ सोईपुरती माणसं समजत होतो आपण. ते तसं नाहीय.

One can't afford to treat the world like a lifeless thing. It's a whole, live, throbbing life... react to it.

Thanks friend, for making me see it. Thanks.

Wednesday 9 May 2007

रक्तात उतरली होती संध्याकाळ...

प्रेम वाटलं म्हणजे नक्की काय झालं? किंवा गौरी देशपांडेच कोट करायची सरळ तर आपण म्हणूया की ’पुरुषांना आणि स्त्रियांना एकमेकांना पाहून होणाऱ्या स्रावांना प्रेम-बिम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं.’

पण तरी तुझ्याबद्दल मला किंवा माझ्याबद्दल त्याला ओढ वाटली किंवा काहीतरी हवंसं वाटलं म्हणजे काय झालं? या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कुठून होत असते? की सुरुवात वगैरे असं काही नसतंच? नुसत्याच गोष्टी घडत जातात, असं?

म्हणजे उदाहरणार्थ तुझे गुलाबी रंगाचे ओठ आठवतात मला. तुझं किंचित चाचरत प्रचंड एक्साईट होऊन बोलणं किंवा एखादी गोष्ट फारशी मनात नसताना ’हॅ हॅ हॅ’ असं मोठ्यांदा कृत्रिम हसून ते गोष्ट उडवून लावणं किंवा तुझी काहीशी बुटकी शिडशिडीत एकरेषीय अंगलट...
हे सगळं फारच शारीर होतंय नाही? पण ’फार शारीर’ किंवा ’कमी शरीर’ असं कुठे काय असतं? मन-बिन म्हणजे तरी काय? या शरीरातल्या पेशींनी एकमुखानं केलेली मागणीच ना? ’शारीर’ या संकल्पनेला बिचकणं थांबवायला हवं. मग कदाचित या सगळ्यातून मला वाटणारा प्रचंड अपराधी भाव संपेल.

कठीण... वेल.... आहेच.

तो आणि मी बोलत असू खूप. फारच ना. सी. फडके पद्धतीत सांगायचं झालं तर तसे उपवर आणि उपवधूही असणारच आम्ही एकमेकांना. उदाहरणार्थ पुस्तकं आणि सिनेमे आणि अंगातला जास्त शहाणपणा आणि ओढून-ताणून आणलेला एकटेपणा आणि कदाचित इम्मॅच्युरिटीही. मला जमू शकणाऱ्या सगळ्या पद्धतीत संवादही साधायचा प्रयत्न केला मी त्याच्याशी. असं समजूनही पाहिलं, की ’येस, या मुलावर आपलं प्रेम आहे’. आणि खरं सांगू, त्या त्या वेळी मला वाटलंही ते खरं...

खरं असणं-नसणं शेवटी वाटण्यावरच अवलंबून असतं की काय? कुणास ठाऊक...

पण इट डिडण्ट वर्क आऊट. तसं तर सारं काही आलबेलच होतं. इथे बिनसलंय, असं काही कुणाला बोट ठेवून म्हणता आलं नसतं. पण ते तसं नाही हे मला कळत गेलं आणि एखाद्याला न समजणारी गोष्ट त्याला ’समजावून देणं’ अशक्य असतं हे माझं मतही दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत गेलं.

तसे स्पर्श वर्ज्य कधी नव्हतेच. म्हणजे थिऑरॉटिकली! कधी कधी हातात हात घेणं वा चारचौघांत वावरताना होणारे स्पर्श विनासंकोच चालवून घेणं हे चालेच. पण कधी स्पर्शाची भाषा वापरून पाहावीशी नाही वाटली मला त्याच्यासोबत. माझी नसलेली तयारी स्पष्टपणे नोंदल्यावर त्यानंही कधी निसटते म्हणूनही स्पर्श केले नाहीत हेही खरंच.
आणि तरीही एखाद्या नियत क्षणी त्याच्यासोबत असताना मला जाणवून गेलेलं माझं सगळं शरीर आठवतंच आहे मला...

पण आमच्या नात्यात हे सारं फारच मुकं राहिलं कायम. ज्या नात्यात त्या ओढीनंच होतात लहान-सहान तपशीलही जिवंत, त्यात आम्ही ते असं मुकाट मिटून टाकावं - हेच किती बोलकं आहे ना?

आणि मग मनात नकळत येत राहिलास तू. आता मागे वळून पाहताना वाटतं, हेही सहज घडलेलं की आपणच घडवून आणलेलं, सहजपणाच्या बनावाखाली? किती सहज-स्वच्छ संगती दिसते ना या साऱ्यांत? आपण कितीही नाकारायची, लपवायची म्हटली तरी ती असतेच आणि देनिस म्हणतो तशी ’कधी ना कधी रहस्याला वाचा फुटतेच...’

संदीपची ती कविता ठाऊक आहे का रे तुला -

मी जाता जाता तुला बोललो काही,
ते खरेच सारे असेल ऐसे नाही
रक्तात उतरली होती संध्याकाळ,
वदवून घेतले तिनेच काहीबाही...

म्हणजे ही रक्तातली संध्याकाळ फक्त? बाकी काही नाही?

मेघना पेठेसारखं नाट्यपूर्ण उत्कटपणे म्हणावंसं वाटतं आहे, ’या इलाही, येह माजरा क्या है...’

Friday 27 April 2007

तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला ग...

शिल्पा आणि रिचर्ड गिअर यांच्यावरून आपल्याकडे जे रामायण चाललंय, त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करणं म्हणजे येडेपणाच आहे.

पण विंदांच्या खास शैलीतली ही कविता मात्र आठवतेय. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ती आठवताना काही औरच मजा येतेय!

विंदा म्हणतात -

तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला ग,
अन्‌ आत्म्याच्या देव्हाऱ्यातुन गंध मधुर दरवळला ग

आज मधाची लाट मनावर उसळत उसळत फुटली ग,
आज सखे मज नकळत अलगज गाठ जिवाची सुटली ग

आगांतुक ही आज दिवाळी उंबरठ्यावर बसली ग,
आज घराची फुटकी कौले अंधाराला हसली ग

चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग,
विश्वफुलातिल पिवळे केंसर, खुणा तयाच्या कळल्या ग...

- विंदा करंदीकर
’मृद्गंध’

Sunday 22 April 2007

अखियोंके पानीमें रखना वो चिठियाँ ...

काही पत्रं लिहिली जातात, पण इच्छित मुक्कामी पोचतातच असं नाही. कधी पोचतात, पण वाचणाऱ्यापर्यंत पोचतात असं नाही. ही अशीच काही पत्रं. अर्ध्यात राहिलेली.

एक काळ असाही होता, जेव्हा तुला फोन करावा, तुझा फोन यावा असं सतत वाटत असे. आता तसं असत नाही. आपण हल्ली एकमेकांना लिहितोही क्वचित. नुसती भांडणं करण्यापेक्षा नकोच ते, असं वाटून थांबलो का आपण? माहीत नाही.

आपण भेटतो तेव्हाही काही हिशोबांची परतफेडच तर करायची असते फक्त. अपेक्षा असतात. अपेक्षाभंग असतात. मग वाट्टेल तसं अद्वातद्वा बोलणं असतं; नाही तर ओठ आवळून गप्प बसणं तरी असतं. प्रश्न असतात... असंच करायचं आहे का आयुष्यभर? याचसाठी केला होता अट्टाहास?
उत्तरं नसतातच.मग अजून भांडणं, चिडचिड, त्रागा, वैताग ...

खरोखर तुला नाही या साऱ्याचा त्रास होत? की तू इतका विचारच करत नाहीस या साऱ्याचा? तू खरोखरच मला गृहित तर धरून चाललेला नाहीस ना?
मलाच कितीतरी वेळा प्रश्न पडतो, का कुणाला तरी हवं असावं मी? तुला इरिटेट होईल इतक्या वेळा हा प्रश्न मी तुला विचारलेला आहे. होय ना? पण तो मला खरोखरच सतावतो. वाटतं, या मुलाने आपल्या असण्यात फक्त सोय तर नाही ना पहिलेली?
हा तुझ्यावर अन्याय असेलही कदाचित. पण तसा तो व्हायला माझ्याइतकाच तूही कारणीभूत आहेस मित्रा. तुझ्या आयुष्याबद्दल काय ठाऊक आहे मला?
तुझा जन्मदिवस, पत्ता, कुटुंबीयांचे तपशील, रंग-वजन-उंची-पगार हे सारे तपशील कदाचित सांगू शकेन मी. पण एकमेकांशी जोडलं जाणं इतकंच असतं फक्त? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच सांगता येणं शक्य नाही आणि तुला सांगितल्याशिवाय ज्याची पूर्तताही व्हायची नाही असं काहीतरी माझ्यापाशी असतं. आपण एकमेकांना हा मान, ही जवळीक देऊ करतो तेव्हा इतर कसल्याही तपशिलांनी येणार नाही इतके जवळ येतो. असा एकच क्षण येऊन पुरत नाही. त्या एका क्षणानं खूण पटेल कदाचित एकमेकांची. पण तिथेच थांबत नाही ते. अशा एका क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत, दुसऱ्यापसून तिसऱ्यापर्यंत ... असे असंख्य प्रवास करायचे असतात.

Am I sounding too romantic or filmy? May be...

हे इतकं बटबटीत आणि फिल्मी वाटत असेल तर मग माझी तोकडी भाषाच त्याला कारणीभूत आहे.
मी मागेही एकदा तुला लिहिलं होतं - कधी कधी सध्या, रोजच्या बोलण्यातून सूर जुळत जतात. समोरचा माणूस जे बोलत असतो, ते आणि तेवढंच बोलत नसतो तो. ऐकू न येणारं, पण जाणवू शकणारं असंही बरंच काही असतं. ते ऐकू यायला लागतं - पटतं, तेव्हा तर आपण अधिकाधिक मोकळे होत जातो.
कधी कधी मात्र असे सूर नाहीच जुळत. किती वचावचा बडबड केली, तरी आपण तस्से कोरडेच राहतो.
अलीकडे मला हे फार जाणवतं. तुझ्या असण्याबद्दल मनातून आनंद- आनंद नाही दाटून येत. आपण एखादी बिझिनेस मीटिंग आटपावी, तसे भेटतो. चार पुस्तकांबद्दल चार ताशेरे झाडतो, दोन टोमणे मारतो, आणि आपापल्या वाटेने चालते होतो.

इतकंच
असायचं होतं का या साऱ्याचं आयुष्य? इतकंच मिळायचं होतं आपल्याला एकमेकांकडून?

माझ्याकडे उत्तरं नाहीत मुला. मला त्रास देणारे प्रश्न मी संगतवार मांडायचा प्रयत्न करते आहे फक्त. मी फार कोरडी आहे स्वभावानं. तुझ्या-माझ्या नात्यात तर फारच. आपल्याकडून कुठून कसल्या प्रेमा-मायेचा अंशही निसटता कामा नये, म्हणून स्वत:वर पहारा देत असल्यासारखी वागते मी. तसेच स्पर्शाबाबतचे माझे संकोच...

या साऱ्याला मी काहीच करू शकत नाही मुला. मी अशी अशी आहे, इतकंच म्हणता येतं फक्त. म्हणून का तू असा रेषा आखून दिल्यासारखा बाहेरचाच झालास?

परवा संध्याकाळी सैरभैर झाल्यासारखी झाले होते मी. उगाच रडायला येत होत. सिनेमा पाहताना मॅडसारखं एकटीनंच रडून घेतलं मी. कारण? ठाऊक नाही. वाटत होतं, किती मोठी मोठी स्वप्नं पाहतो आपण.. आणि प्रत्यक्षात मात्र हातात काहीच मिळत नाही. जेमतेम भाकर तुकडा मिळवण्याचे हिशेब, अजून पैसे मिळवण्याचे काटेकोर क्षुद्र बेत.. घर नि दार... हे काय होऊन बसलंय... असे काहीतरी निराशावादी विचार. आता नवे बेत करायचं वय सरत चालल्याची घाबरवून टाकणारी जाणीव. 'सामान्यपण’ स्वीकारणं फार जड जात होतं...

त्या क्षणी मला इतकं प्रचंड एकटं वाटलं -
आपल्याला जिथे तुटतं आहे, ते कुणालाच - दुसऱ्या कुणालाच - सांगून समजणार नाही अशी भयानक खात्री माझी मलाच. आणि त्याचंही वाईट वाटतंच आहे...
ब्रह्मांड अनुभवलं.

पण तेव्हाही, निसटता प्रयत्न तरी करून पाहू असं म्हणूनही, तू नाही आठवलास.

हे आत्ता. आपण अजुनी एकमेकांच्या आयुष्याशी अधिकृतपणे - समाजमान्य पद्धतीने जोडलेही गेलेलो नसताना.

का रे हे असं होऊन बसलं?
की हे असंच असायचं असतं?
इतकंच?

Tuesday 6 March 2007

All the best

Hi!

Ajoon maraaTheet (pakshee: dewanaagareet) kasa lihaayacha yaach muddyaawar JhaTaapaT chaalalelee asalyaamuLe kaahee lihiNa jamalelach naahee!

pan aapaN kaaheehee lihoo shakato aaNi te waachaNyaasaaThee khula asat, hee kalpanaach muLat bhannaaT aakarshak aahe. patrahee navhe aaNi Daayareehee.. wow...

haataat kurhaaD tar miLaleey. aataa kuThalee bichaaree zaaD marataat, te paahaayach! All the best!!!

Thursday 8 February 2007

उपाशी माणसाचे मनोगत

खूप दिवसांच्या उपाशी माणसाला अन्न मिळाल्यावर त्याला नेमकी कुठून सुरुवात करावी तेच कळेनासे होते. माझे नेमके तसेच झाले आहे. भानावर येऊन अन्नाची नीट चव कळू लागायला आणि दाद देत मनापासून जेवायला काही काळ जावा लागेल!!!